NASA च्या रिपोर्टमधून मोठा खुलासा; मुंबईसह भारतातील 12 किनारपट्टीची शहरे जाणार पाण्याखाली, जाणून घ्या कारण

हवामान बदलांवरील आंतरसरकारी पॅनेलच्या नवीन अहवालात (IPCC) भारतासाठी गंभीर इशारे देण्यात आले आहेत. भारत आधीच हवामान आणि पर्यावरणीय बदलाच्या समस्येमधून जात आहे, त्यात आता या इशाऱ्यामुळे चिंता वाढली आहे

Marine Drive | (Photo Credits-ANI)

हवामान बदलांवरील आंतरसरकारी पॅनेलच्या नवीन अहवालात (IPCC) भारतासाठी गंभीर इशारे देण्यात आले आहेत. भारत आधीच हवामान आणि पर्यावरणीय बदलाच्या समस्येमधून जात आहे, त्यात आता या इशाऱ्यामुळे चिंता वाढली आहे. या अहवालामध्ये नमूद केलेला सर्वात रिस्की घटक म्हणजे, समुद्राची वाढत असलेली पातळी (Sea Level) हा होय. यामुळे शतकाच्या अखेरीस देशातील 12 किनारपट्टीची शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. युनायटेड स्टेट्सच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ने हे भाकीत केले आहे.

नासाने सी लेव्हल प्रोजेक्शन टूल तयार केले आहे. जेणेकरून लोकांचे जीवन आणि मालमत्ता समुद्र किनाऱ्यांवर येणाऱ्या आपत्तीपासून वेळेत सुरक्षित ठवता येऊ शकतील. या ऑनलाईन साधनाद्वारे, भविष्यातील आपत्तीची स्थिती म्हणजे वाढणारी समुद्राची पातळी जाणून घेता येईल. नासाने हवामान बदलावरील आंतरसरकारी पॅनेलच्या अहवालाचा हवाला देत अनेक शहरे समुद्रात बुडण्याच्या इशाऱ्याचा पुनरुच्चार केला आहे. आयपीसीसीचा हा सहावा मूल्यांकन अहवाल 9 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला, जो हवामान प्रणाली आणि हवामान बदलांच्या परिस्थितीबाबत अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण करतो.

या अहवालात म्हटले आहे की, 2100 पर्यंत जगाचे तापमान लक्षणीय वाढेल. भविष्यात लोकांना कडक उन्हाचा सामना करावा लागेल. जर कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण थांबवले नाही तर तापमान सरासरी 4.4 अंश सेल्सिअसने वाढेल. पुढील दोन दशकात तापमानात 1.5 अंश सेल्सिअसने वाढ होईल. पारा इतक्या वेगाने वाढल्याने हिमनद्या वितळतील, ज्याचे पाणी मैदानी आणि समुद्री भागात विनाश आणेल.

अहवालानुसार, सुमारे 80 वर्षांनंतर म्हणजेच 2100 पर्यंत भारतातील 12 किनारपट्टीची शहरे समुद्र पातळी वाढल्यामुळे, सुमारे 3 फूट पाण्यात जातील. म्हणजेच कांडला, ओखा, भावनगर, मुंबई, मोरमुगाओ, मंगलोर, कोचीन, पारादीप, खिदीरपूर, विशाखापट्टणम, चेन्नई आणि तुतीकोरिन शहरांच्या किनारपट्टीचे क्षेत्र लहान होईल. अशा परिस्थितीत किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांना भविष्यात सुरक्षित ठिकाणी जावे लागेल. (हेही वाचा: डीएमध्ये वाढीनंतर केंद्र सरकारचा अजून एक मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या 'या' योजनेच्या मुदतीत केली वाढ)

दरम्यान, त्याचे खोल परिणाम भारतासह आशिया खंडातही दिसू शकतात. या अहवालावर भाष्य करताना पर्यावरण तज्ञ पंकज सरन म्हणाले, '100 वर्षांमध्ये जे बदल आपल्याला पाहायला मिळत होते ते आता 10 ते 20 वर्षांमध्ये दिसू लागले आहेत.'

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now