Assam: भाजप उमेदवाराच्या गाडीत सापडले EVM मशीन; काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी निवडणूक आयोगाकडे केली कारवाईची मागणी

प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'प्रत्येक वेळी निवडणुकांच्या वेळी व्हिडिओ येतात, ज्यात खाजगी वाहनात ईव्हीएम घेऊन जाताना दिसतात. यात एक गोष्ट सामान्य आहे आणि ती म्हणजे ही वाहने भाजपच्या उमेदवारांची किंवा त्यांच्या मित्रपक्षांची असतात.

EVM machine (PC - Twitter)

Assam: गुरुवारी आसामच्या बाराक खोऱ्यात दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर ईव्हीएमशी संबंधित दोन स्वतंत्र घटनांमुळे वातावरण तणावग्रस्त बनले. पहिली घटना करीमगंज जिल्ह्यातील पाथरकांडी विधानसभा मतदारसंघात उघडकीस आली. तेथे भाजप नेते कृष्णेंदू पॉल यांच्या कारमध्ये ईव्हीएम ठेवल्याचा आरोप झाल्याने हिंसाचार झाला. यामुळे स्थानिक लोकांमध्ये तणाव निर्माण झाला. गुवाहाटी येथील पत्रकार अतनु भुयान यांनी पॉल यांच्या कारमध्ये ईव्हीएम असल्याचा दावा करत ट्वीट केलं. त्यानंतर वादाला सुरुवात झाली. या व्हिडिओमध्ये काही लोक कारभोवती फिरताना दिसत आहेत. यावेळी पॉल गाडीमध्ये हजर नव्हेते. तथापि, या व्हिडिओमागील सत्य अद्याप समोर आलेलं नाही.

या संपूर्ण प्रकरणावर भाजपचे आमदार कृष्णेंदू पॉल यांनी कोणतेही विधान केलेले नाही. याबाबत स्थानिक प्रशासनाकडूनही कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, व्हिडिओमधील कार पॉल यांच्या भावाची आहे. या प्रकरणावरून कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनी ट्वीट करून निवडणूक आयोगाकडे खासगी कारमध्ये ईव्हीएम नेल्याने कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रियांका गांधींनी अनेक ट्वीट करून याप्रकरणी भाजपला लक्ष्य केलं आहे. (वाचा - Tamil Nadu Assembly Election 2021: DMK नेते A Raja यांच्यावर 48 तासांसाठी प्रचारबंदी; आक्षेपार्ह वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय)

प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'प्रत्येक वेळी निवडणुकांच्या वेळी व्हिडिओ येतात, ज्यात खाजगी वाहनात ईव्हीएम घेऊन जाताना दिसतात. यात एक गोष्ट सामान्य आहे आणि ती म्हणजे ही वाहने भाजपच्या उमेदवारांची किंवा त्यांच्या मित्रपक्षांची असतात. पुढे त्यांनी म्हटलयं की, अशा प्रकारच्या व्हिडिओंवर प्रश्न विचारणाऱ्यांना भाजप नेहमीचं आपल्या मीडिया यंत्रणेचा वापर करून हरवत असते. सत्य हे आहे की असे अनेक प्रकरणे आहेत. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. आता देशभरातील सर्व राष्ट्रीय पक्षांनी ईव्हीएमच्या वापराबाबत विचार करायला हवा, असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गुरुवारी आसाममधील 39 जागांवर दुसर्‍या टप्प्यातील मतदान झाले. मतदारांनी विक्रमी 77 टक्के मतदान करून निवडणुकीत प्रचंड उत्साह दर्शविला आहे. मात्र, मतदान काळात बर्‍याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटनांचीही नोंद करण्यात आली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now