On This Day in 2019: आजच्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप सेमीफायनलमधील पराभवाने झाले कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न भंग
भारत-न्यूझीलंड वर्ल्ड कप 2019 (Photo Credit: Getty)

10 जुलै 2019, ही ती तारीख ज्याची कोणत्याही भारतीय क्रिकेट (Indian Cricket) चाहत्यांला विसर पडणार नाही. आजच्या दिवशी अगदी एक वर्षापूर्वी क्रिकेटच्या इतिहासातील तो दिवस होता जेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) वर्ल्ड कपची (World Cup) जिंकण्याची मोहिम संपुष्टात आली. केन विल्यमसन याच्या नेतृत्वात न्यूझीलंडने (New Zealand) वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यात भारताचे तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंग केले आणि फायनलमध्ये धडक मारली. 2019 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने जोरदार खेळ केला आणि 9 पैकी 7 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. सेमीफायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड आमने-सामने आले आणि अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडिया आवडीचा संघ होता. परंतु, टीम दबाव खाली अडखळली परिणामी त्यांना धक्कादायक पराभव सहन करावा लागला. 9 जुलै 2019 रोजी सुरु झालेला सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजे 10 जुलैला संपुष्टात आला ज्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. (MS Dhoni Retirement: एमएस धोनीच्या निवृत्तीवर त्याच्या मॅनेजरने दिली मोठी अपडेट, पाहा काय म्हणाले)

मॅन्चेस्टर येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात किवी कर्णधारविल्यमसनने टॉस जिंकून पहिले फलंदाजी निवडली. मार्टिन गप्टिल लवकर बाद झाला पण हेनरी निकोलस आणि विल्यमसनने डाव सावरला असला तरी धावगती मात्र कमी होती. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर रॉस टेलर फलंदाजीला आला ज्याने टीमला गती मिळवून दिली. त्यानंतर मॅन्चेस्टरमध्ये पावसाने व्यत्यय आणल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही. पावसाने खेळ थांबवला तेव्हा न्यूझीलंडने 46.1 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 211 धावा केल्या होत्या. राखीव दिवशी खेळ होताच न्यूझीलंडने गती पकडली पण त्यांना 239/8 धावसंख्या करता आली.

विराट सेने कडे मजबूत फलंदाज असल्याने ते 240 धावांचे लक्ष्य सहज गाठेल असे दिसत होते, मात्र मॅट हेन्री आणि ट्रेंट बोल्ट यांनी भारताचे तीनही आघाडीचे फलंदाज-रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली फक्त 1 धाव करून माघारी धाडले. यामुळे संपूर्ण दबाव मध्य आणि लोवर-ऑर्डर फलंदाजांवर आला. रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याने प्रतिकार केला पण दोघे 32 धावा करून बाद झाले आणि भारताने 92 धावांवर 6 विकेट गमावल्या. भारताचा पराभव अटळ आहे असे दिसत असताना एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी टीमला सामना जिंकण्याच्या आशा दिल्या. पण, जडेजा 77 धावा करून बाद झाला आणि धोनीला 50 धावांवर गप्टिलने धावबाद केले. यानंतर किवी टीमने अखेरीस विजय निश्चित केला आणि भारत 221 धावांवर ऑलआऊट झाला. यानंतर धोनीने खेळातून विश्रांती जाहीर केली आणि अद्यापही चाहत्यांना त्याच्या परतण्याची प्रतीक्षा आहे.