India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात झाली. (IND vs BAN T20I Series 2024) पहिला सामना ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला आहे. यासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियासाठी हार्दिक पांड्याने 16 चेंडूत 39 धावांची स्फोटक खेळी खेळली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले.
त्याआधी प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने तीन षटकांत दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या आहेत. त्यानी 19.5 षटकात ऑलआऊट होवून 127 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने लिटन दास (4) आणि परवेझ (8) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. वरुण चक्रवर्तीने तौहीदला बाद केले. तौहीद 18 चेंडूत 12 धावा करून बाद झाला.
पदार्पणाच्याच सामन्यात मयंक यादवने महमुदुल्लाला (1) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वरुणने जाकर अलीला क्लीन बोल्ड केले. 25 चेंडूत 27 धावा करून कर्णधार नझमुल शांतो वॉशिंग्टनचा बळी ठरला. रिशाद हुसेनला (11) बाद करून वरुणने सामन्यातील तिसरी विकेट घेतली. तस्किन धावबाद झाला, तर हार्दिकने शरीफुल इस्लामला क्लीन बोल्ड केले.
याला प्रत्युत्तर म्हणून भारताने धमाकेदार सुरुवात केली. मात्र, अभिषेक शर्मा धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. अभिषेकने 7 चेंडूत 16 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने 14 चेंडूत 29 धावा केल्या. संजू सॅमसनने 19 चेंडूत 29 धावा केल्या. मेहदीने त्याला बाद केले. यानंतर नितीश आणि हार्दिक यांच्या 52 धावांच्या भागीदारीमुळे भारताने हा सामना सात विकेटने जिंकला. हार्दिकने 16 चेंडूत 39 आणि नितीशने 15 चेंडूत 16 धावांचे योगदान दिले.