India Beat Australia: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी (DLS) केला पराभव, कांगारुंना नमवत मालिकाही जिंकली
टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात केएल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसला होता.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात केएल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसला होता. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत पाच गडी गमावून 399 धावा केल्या. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 105 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. पावसामुळे 17 षटके कापण्यात आली आहेत. ऑस्ट्रेलियाला 33 षटकात 317 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 28.1 षटकात अवघ्या 217 धावा करून अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाकडून सीन अॅबॉटने सर्वाधिक 54 धावा केल्या. टीम इंडियाकडून आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे.