महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: 'कामं निश्चित वेळेत करणं अवघड'; अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवर (Ajit Pawar) यांनी आपल्या विधानांद्वारे याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.

Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections 2024) संदर्भात निवडणूक आयोग केव्हाही आचारसंहिता (Code of Conduct) जाहीर करु शकतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवर (Ajit Pawar) यांनी आपल्या विधानांद्वारे याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये, भेटीगाठी, सभा, मेळावे आणि पदयात्रांचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला महाविकासआघडी आणि महायुती यांची आपापल्या घटकपक्षांमध्ये जागावाटपाबाबतही चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता निवडणुकीबाबत निर्णय जाहीर होण्याचा अंतिम टप्पा आला आहे, असे मतदारांनाही जाणवू लागले आहे.

अजित पवार यांनी नेमकं काय म्हटले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक उद्योग मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान काही नागरिकांनी आपापल्या मागण्यांचे, प्रश्नासंबंधी निवेदने दिली. हाच धागा पकडत उपस्थितांना उद्देशून बोलताना अजित पवार यांनी म्हटले की, आपण इतक्या मोठ्या प्रमाणात निवेदने देता आहात खरे. पण त्यावर कार्यवाही होऊन निश्चित वेळेत काम होईल, असे वाटत नाही. कारण आता चारदोन दिवसांमध्येच आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे ही कामे करण्यास विलंब लागू शकतो. त्यामुळे कामे इतक्यात होणं काहीसं अवघड आहे, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, विधानसभा निवडणूक: अमित शाह यांचा हादरा; एकनाथ शिंदे, अजित पवार यांना धक्का; महायुती फुटण्याचे संकेत)

लवकरच विधानसभा निवडणूक

अजित पवार यांच्या विधानामुळे राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election 2024) जाहीर होईल असा तर्क राजकीय वर्तुळात व्यक्त होतो आहे. दरम्यान, पवार यांनी कार्यकर्तांना उद्देशून म्हटले की, लोकसभा निवडणुकीत जे काही झाले ते विसरुन जाऊ. आता नव्याने प्रयत्न करु. पाठिमागचे जवळपास 30 वर्षे मी राजकारणात आहे. या काळात मी बारामतीमध्ये चांगले वातावरण ठेवण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहे. म्हणूनच आपण इतकी वर्षे घड्याळाचे बटण दाबत आला आहात. अपवाद फक्त लोकसभा निवडणुकीचा ठरला. आता विधानसभेला झालेली चूक सुधारा. घड्याळ चिन्हासमोरचेच बटण दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजयी करा, असे अवाहनही त्यांनी केले. (हेही वाचा, Ajit Pawar NCP: महायुती पेचात, भाजपचे कट्टर हिंदुत्त्व आणि अजित पवार यांचे मुस्लिम कार्ड; शिंदे सेनेचे काय?)

सूरज चव्हाण याची भेट घेण्याची शक्यता

दरम्यान, मराठी बिग बॉस 5 मध्ये बारामतीचा रीलस्टार सूरच चव्हाण याने ट्रॉफी जिंकली. तो बारामतीचा आहे. सहाजिकच त्याची राजकीय वर्तुळतही चर्चा झाली. त्यामुळे अजित पवार यांनी आपल्या भाषणातही त्याचा उल्लेख केला. ते म्हणाले आपल्या बारामतीच्या तरुणाने ट्रॉफी जिंकली आहे. नुकात मी त्याच्याशी संपर्क केला. तोही भेटूया म्हणाला. जमलं तर त्याचीही भेट घेईन, असे अजित पवार म्हणाले.