Shiv Jayanti 2021 Guidelines: शिवजयंतीसाठी 10 नव्हे 100 जणांना परवानगी; परिपत्रकातील चुकीत ठाकरे सरकारकडून दुरुस्ती
Shiv Jayanti 2021 (Photo Credits: Wikimedia Commons and PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती (Shiv jayanti) साजरी करण्यावर राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. यासाठी मार्गदर्शन सूचना काल (गुरुवार, 11 फेब्रुवारी) राज्य सरकारच्या गृह विभागाकडून जारी करण्यात आल्या. यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी केवळ 10 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असल्याचे नमूद केले होते. परंतु, आज (शुक्रवार, 12 फेब्रुवारी) गृह विभागाने शुद्धिपत्रक जारी केलं आहे. यात मुद्दा 3 मधील ओळ क्रमांक 4 मध्ये 10 ऐवजी 100 असे वाचावे, असे म्हटले आहे. याचाच अर्थ शिवजयंती सोहळ्याला 10 नव्हे तर 100 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असल्याचे ठाकरे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

19 फेब्रुवारी रोजी अनेक संस्था, संघटनांकडून तसंच शासकीय पातळीवर शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा कोविड-19 संकटाचे सावट असल्याने विशेष नियम लागू करण्यात आले आहेत. (Shiv Jayanti 2021 Guidelines: यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन; राज्य सरकारकडून मार्गदर्शन सूचना जारी)

शिवजयंती 2021 साठी मार्गदर्शक सूचना:

# शिवजयंती निमित्त 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 वाजता शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी करतात. मात्र यंदा कोरोना सावटामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे.

# शिवजयंती निमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांवर देखील निर्बंध लादण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. अशा कार्यक्रमांचे केबल नेटवर्क किंवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

# प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुकी काढू नयेत.

# शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रम केवळ 100 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

# तसंच या कार्यक्रमादरम्यान कोरोना विषयक नियमांचे म्हणजेच मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टसिंग याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

# कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

दरम्यान, शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याच्या सरकारच्या निर्णयावर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवजयंती साजरी करण्यास परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपचे आमदार राम कदम यांनी दिला आहे.