
राज्य सरकारने बिगर कृषी विद्यापीठांमध्ये अध्यापन पदांसाठी भरती प्रक्रियेला (Recruitment Process For Teaching Position) मान्यता दिली आहे, ज्यामध्ये ‘अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी’, एक नवीन निवड पद्धत लागू केली जाणार आहे. गुणवत्तेला प्राधान्य देणारी सुधारित प्रक्रिया गुरुवारी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली. त्यांनी या बदलांचा उद्देश प्राध्यापक भरतीमध्ये निष्पक्षता आणि कार्यक्षमता सुधारणे आहे यावर भर दिला. नवीन निवडप्रक्रियेच्या अधीन राहून प्राध्यापक भरतीत गुंतलेल्या विद्यापीठांना त्यांच्या चालू निवड प्रक्रिया पूर्ण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भविष्यातील सर्व भरती प्रक्रिया नवीन स्थापित प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करतील, असे सरकारने सांगितले.
अशी असेल नवीन भरती प्रक्रिया-
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यपाल तथा कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी गुणांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये शैक्षणिक क्रेडेन्शियल आणि त्यांची मुलाखतीमधील कामगिरी गृहीत धरण्यात येणार आहे. या दोन्ही बाबी एकत्रित करून अधिक पारदर्शक, निष्पक्ष निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
मुल्यांकन पद्धत-
शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनाला 80 टक्के गुण (वेटेज) तर मुलाखतीसाठी 20 टक्के गुण (वेटेज) देण्यात येणार आहे. एकत्रित 100 गुणांपैकी किमान 50 टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांनाच अंतिम निवडीसाठी पात्र असतील.
अध्यापन क्षमता अथवा संशोधन प्राविण्य (Aptitude) यांचे मुल्यमापन परिसंवाद (Seminar) अथवा व्याख्यान प्रात्यक्षिक (Lecture In a Classroom Situation) अथवा अध्यापन आणि संशोधन यामधील नवीनतम तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेवरील चर्चा या बाबी मुलाखतीच्या टप्प्यावर विचारात घेण्यात येतील. निवड समितीच्या बैठकांचे दृक-श्राव्य चित्रिकरण करण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दृक-श्राव्य चित्रिकरण, बैठकीला उपस्थित असलेल्या निवड समितीच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने सीलबंद करण्यात येईल. (हेही वाचा: मराठी भाषेतून MA करणार्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा TMC चा निर्णय मागे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश)
मुलाखती पूर्ण होताच त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल. ही सर्व निवड प्रकिया सहायक प्राध्यापक पदासह सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी लागू राहील. सुधारित कार्यपद्धतीमुळे गुणवत्ताधिष्ठित अध्यापकांची निवड होईल. तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.