Pankaja Munde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पाठिमागच्या वर्षी गडबड झाली. विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. पण, या पराभवाचे मला दु:ख नाही. वाईट वाटत नाही. जोपर्यंत ही जनता आहे, त्यांचे पाटबळ आहे, तोवर मी कशालाच आणि कुणालाच घाबरत नाही, असे उद्गार भाजप नेत्या आणि विधानपरिषदेवरील आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी काढले आहेत. त्यांचा दसरा मेळावा (Pankaja Munde, Dasara Melava 2024) भागवनगड येथे पार पडला. या मेळाव्यासाठी जमलेल्या लोकांना उद्देशून बोलताना त्यांनी हे उद्गार काढले. मला ऊसतोड कामगारांचे आयुष्य बदलायचे आहे, त्यांच्यासाठी काम करायचे आहे. त्यांच्या गावापर्यंत रस्ते करायचे आहेत, असेही त्या म्हणाल्या. या मेळाव्यासाठी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) , माजी खासदार सुजय विखे पाटील, राष्ट्रय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांचा खास उल्लेख

एक दोन नव्हे तर तब्बल 12 वर्षांहूनही अधिक काळ परस्परांशी संघर्ष केलेल्या धनंजय मुंडे यांनी प्रथमच भागवनगडावरील मेळाव्यास हजेरी लावली. या बहिण भावंडांना एकत्र पाहून उपस्थितां जनसमूदयाने आनंद व्यक्त केला. याच मेळाव्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि धनगर समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके हे देखील उपस्थित होते. या दोघांचाही उल्लेख पंकजा मुंडे यांनी खास शब्दांमध्ये केला. मुंडे यांना 'धनूभाऊ' तर प्रा. हाके यांचा उल्लेख गोंडस लेकरु असा केला. त्यांचा यंदा दसरा मेळावा 2024 कसा पार पडतो याकडे प्रसारमाध्यमांचेही बारीक लक्ष होते. (हेही वाचा, Mahadev Jankar on Gopinath Munde: पंकजा मुंडे यांच्यापेक्षा माझी वाताहत अधिक, महादेव जानकर असं का म्हणाले?)

गोपीनाथ मुंडे यांनी मला जनतेच्या पदरात टाकले

मागच्या काही काळात माझ्याकडे काहीच नव्हते. ना आमदारकी होती, ना कुठले मंत्रीपद होते. संघटनेतही राज्यात कोणते पद नव्हते, ना पैसा होता ना आडका होता. तरीही भागवनगडावरची जनतेचा विश्वास आणि प्रेम किंचीतही कमी झाले नाही. हीच माझी संपत्ती आहे. माझ्या वडीलांनी म्हणजेच गोपीनाथ मुंडे यांनी मला आपल्या (उपस्थित जनतेच्या) पदरात टाकले आहे. माझ्या वडिलांनंतर आपणच माझी ताकद आहे. तेच माझे प्रेम आहे. हे प्रेम आहे तोवर मला काही जरी नाही मिळाले तरी, मी एक तसूभरही मागे हटणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. (हेही वाचा, Manoj Jarange Patil Dasara Melava Speech: विधानसभा आचारसंहिता लागेपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा सुट्टी नाही! मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा)

पंकजा मुंडे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण

पुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, लोक म्हणतात ताई तुम्ही आमदार झालात. पण, काय करु त्या आमदारकीचं? ती मिळाली.. पण माझ्यासाठी त्या पाच पोरांनी जीव दिला. त्यांच्यासमोर काय करु या आमदारकीचे? असा सवाल उपस्थित करत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा जनतेला भावनिक साद घातली. तसेच, आगामी काळात आपण राज्यभर दौरा करणार आहोत. जनतेला भेटण्यासाठी येणार आहोत. आपली मला शेवटपर्यंत साथ हवी आहे, असे म्हणत पंकजांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचीही अप्रत्यक्षरित्या पायाभरणी केली.