Aaditya Thackeray At Nagpur: 32 वर्षांच्या तरुणाला घाबरलं 'खोके सरकार'; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
Aaditya Thackeray | (Photo Credit - Facebook)

Aaditya Thackeray in Nagpur Winter Session: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिशा सालीयन प्रकरणाची एसआटी द्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरे यांना सभागृहाबाहेर विचारले असता, चौकशी व्हायची ती होऊ देत. त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण, जी व्यक्ती आज हायात नाही. त्या व्यक्तीच्या नावे बदनामी सुरु आहे. तिच्या कुटुंबीयांनाही याचा नाहक त्रास होतो आहे. पण, केवळ लोकांचे लक्ष भटकविण्यासाठी हे सगळे सुरु आहे. यातून एकच लक्षात येते की, 32 वर्षांच्या तरुणाला खोके सरकार घाबरले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी या वेळी म्हटले की, आम्ही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा एनआयटी घोटाळा काढला आहे. हे सरकार बेकायदेशीरपणे वागत आहे. याचे अनेक पुरावे आम्ही जनतेसमोर आणत आहोत. सभागृहातही हे मुद्दे आम्ही उचलून धरत आहोत. हे सगळे होऊ नये. लोकांचे लक्ष भटकले जावे. यासाठीच सरकार हे उद्योग करत आहे. सत्ताधारी लोकच आंदोलन करत आहेत. सभागृहाच्या वेलमध्ये येत आहेत. विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. अध्यक्ष, तालिका अध्यक्ष आम्हाला बोलू देत नाहीत. सत्ताधारी सदस्यांना सभागृहात सलग बोलू दिले जाते. सत्ताधारी गटाचे 14-14 सदस्य सलग बोलतात. पण, विरोधकांमधून एकाही सदस्याला बोलू दिले जात नाही. ही लोकशाहीची गळचेपी आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी करणार चौकशी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा)

सत्ताधारी वर्गाकडून हुकुमशाही सुरु आहे का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारला असता, हुकुमशाही नाही. परंतू हे सरकार घाबरले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मी लहानपणापासून विधिंडळ कामकाज टीव्हीवर पाहात आलो आहे. तसेच, अडीच वर्षांपासून (पाठीमागील) मी पाहातो आहे. असं कधी घडलं नव्हतं. परंतू, हे घटनाबाह्य सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने विरोधी पक्षांचा आवाज दाबला जातो आहे. त्यांची संसदीय आयुधंही त्यांना वापरु दिली जात नाहीत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.