महाराष्ट्र: 9 जुलै मध्यरात्री पासून रिक्षा चालकांचा बेमुदत संप, भर पावसात जनतेची परवड
मुंबई , ठाणे आणि राज्यातील रिक्षा चालकांनी 9 जुलै ला मध्यरात्री 12 पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची घोषणा केलीय, यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात उद्या नागरिकांची परवड होणार आहे.
मुंबई (Mumbai) , ठाणे (Thane) आणि राज्यातील रिक्षा चालकांनी 9 जुलै ला मध्यरात्री 12 पासून बेमुदत संपावर (Auto Rickshaw Strike) जाणार असल्याची घोषणा केलीय, यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात उद्या नागरिकांची परवड होणार आहे. रिक्षा भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतूक तसेच ओला-उबरसारख्या टॅक्सी सेवा बंद करण्याच्या या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात वारंवार बैठका झाल्या होत्या . पण देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याबाबत कोणतीही पावलं उचलली गेली नसल्याने रिक्षाचालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे
ANI ट्विट
हे ही वाचा -बोगस, मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई; रिक्षा प्रवासाच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर जारी
'या' आहेत रिक्षा चालकांच्या प्रमुख मागण्या
- ओला, उबरसारख्या अवैध टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी
- रिक्षा चालक-मालकांसाठी असलेले कल्याणकारी महामंडळ परिवहन खात्यांतर्गत असावे
- विमा कंपनीत भरण्यात येणारे पैसे तिथे न भरता कल्याणकारी महामंडळात जमा करावे
- चालक-मालकांना पेन्शन, उपदान (ग्रॅज्युईटी), भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय मदत दिली जावी
- जुन्या हकिम समितीच्या शिफारशीनुसार रिक्षा भाड्यात चार ते सहा रुपये वाढ करावी
- बेकायदा प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती करावी
दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना कृती समितीकडून निवेदन पत्रक देण्यात आले होते मात्र त्यावर काहीच कृती न झाल्याने 9 जुलै पासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.