धक्कादायक! मुंबईच्या पवई परिसरातील डोंगर हरवला; पोलीस तक्रारीमुळे खळबळ
डोंगर हरवला आहे | (Photo courtesy: archived, edited, symbolic images )

अभिनेता मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांच्या एका चित्रपटात विहीर हरवल्याची घटना आपण पाहिली असाल. ही घटना चित्रपटातील कथानकाला चालना देण्यासाठी काल्पनीक पद्धतीने रंगवली होती. पण, मुंबईत चक्क डोंगर हरवल्याचीच (Mountains goes missing) तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. मुंबईतील पवई (Powai) परिसरातील डोंगर (Mountains) हरवल्याचा दावा तक्रारकर्त्याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. वृत्त वाचून आपल्यापैकी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल पण खरोखरच असा प्रकार घडला आहे.

ही तक्रार एका पर्यावरणवाद्याने केल्याचे एबीपी माझाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, तक्रारकर्त्याचे नाव समजू शकले नाही. तसेच, या तक्रारीत कोणाचे नाव अगर कोणावर आरोप आहे काय याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, पवई परिसरात महिनाभरापूर्वी एक डोंगर दिसत होता. मात्र, अलिकडील काही दिवसांमध्ये तो डोंगर दिसत नसून, तो गायब झाल्याचे या पर्यावरणवाद्याचे म्हणने आहे. (हेही वाचा, 5 वर्षांत 80 देशांतील 250 शहरांचा दौरा; पर्यटनासाठी विकले घरदार)

मुंबईतील आरे कॉलनीला लागलेली आग आटोक्यात आली असली तरी अद्यापही धुमसत आहेच. ती पूर्णपणे विझली नाही. आगीच्या घटनांमुळे पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानच आता डोंगर गायब झाल्याचीही तक्रार आल्याने खळबळ उडाली आहे. पवई परिसरातील स्थानिक नागरिक सांगतात की, गेल्या काही महिन्यांपर्यंत येथील डोंगरावर दाट झाडी पाहायला मिळायची. या झाडीत अनेक वन्यजीव, प्राणी, पक्षी पाहायला मिळायचे. मात्र, गेल्या काही दिवसांत खासगी विकासकांनी जीसीबी आणि डंपरच्या सहाय्याने अख्खा डोंगरच पोकरायला सुरुवात केली. याचा अतिरेक इतका झाला की, इथला डोंगरच गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी, चतूर राजकीय नेते आणि पैसेवाली बिल्डर आणि कारखानदार मंडळींच्या संगनमतानेच हा प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिक करतात.