Maharashtra Budget Session 2020: सोमवारपासून सुरू होणार महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
महाराष्ट्र राज्य विधिमंडळ (Photo Credit : Youtube)

Maharashtra Budget Session 2020: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, हिंगणघाट जळीतकांड, धनगर आरक्षण, महिलांच्या सुरक्षितता, मराठा आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी, सुधारित नागरिकत्व कायदा आदी विषय मांडत विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील. 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 6 मार्चला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी 6 वाजता सभागृहांचे विरोधी पक्षनेते, गटनेते आणि ज्येष्ठ आमदारांना चहापान व चर्चेसाठी 'सह्याद्री' अतिथीगृहात आमंत्रित केले आहे. मात्र, या चहापानावर विरोधी पक्ष बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजकडून राज्यात 400 ठिकाणी राज्य सरकारविरुद्ध धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात भाजप उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व तसेच शेतकरी कर्जमाफी करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करीत हल्लाबोल करणार आहे. (हेही वाचा - Maharashtra Budget 2020: 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन; 6 मार्चला सादर होणार महाराष्ट्र अर्थसंकल्प)

या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड व्हावी, यासाठी नवे विधेयक मांडणार आहे. तसेच राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तांतील विद्यार्थ्यांना मराठी भाषा अनिवार्य करण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकार विधेयक मांडणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर  शेतकऱ्यांचा साताबार कोरा करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी योजनेत विविध अटी घातल्या. त्यामुळे या कर्जमाफीपासून अनेक कर्मचारी वंचित राहिले. या अधिवेशनात ठाकरे सरकारच्या फसव्या कर्जमाफीवर विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेणार आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार शेतकरी कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवीन सवलत योजना सुरू करण्याची शक्यता आहे.