Maharashtra Assembly Elections 2019: भाजप कडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार यादीतून 'या' बड्या नेत्यांना डच्चू, पण का?
bjp | (Archived and representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येत्या 21 ऑक्टोंबरला पार पडणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. पण भाजप पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार यादीनंतर कोणाला तिकिट दिले आहे हा विषय आता चर्चेचा ठरला आहे. खासकरुन पक्षातील तीन दिग्गज नेते म्हणजेच एकनाथ खडसे (Eknath Khadse), प्रकाश मेहता (Prakash Mehta) आणि विनोद तावडे (Vinod Tawde) यांना अद्याप विधानसभा निवडणूकीसाठी तिकिट देण्यात आलेले नाही. एवढेच नाही तर भाजपमधील राज्यसभेचे सदस्य नारायण राणे यांचा मुलगा नितिश राणे याचे सुद्धा नाव जाहीर करण्यात आलेल्या दोन उमेदवार यादीतून गायब आहे. त्यामुळेच आता भाजपने विधानसभा निवडणूकीसाठी बड्या नेत्यांना का डच्चू दिला आहे या वरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि विनोद तावडे हे तीनजण भाजपतील बडे नेते मंडळी आहेत. 2014 मध्ये भाजप सरकार आल्यानंतर या तिघांना मंत्रिमंडळात सहभागी करण्यात आले होते. पण एकनाथ खडसे जास्त काळासाठी कॅबिनेटमध्ये राहू शकले नाहीत. तर MIDC जमीन घोटाळा प्रकरणी त्यांचे नाव आल्यानंतर 2016 मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकारानंतर ही खडसे यांना पक्षाच्या विरोधात अनेक विधाने केली असल्याचे ही दिसून आले होते. परंतु एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली नसली तरीही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे खडसे यांची उमेदवारी भाजपसमोर मुश्किल ठरु शकते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खडसे यांच्या जागी त्यांच्या मुलीला भाजपकडून तिकिट देण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसऱ्या बाजूला प्रकाश मेहता यांच्याबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मेहता घाटकोपर पूर्व येथील आमदार आहेत. तर भाजप कडून या ठिकाणी अद्याप कोणत्याही उमेदवारीला तिकिट दिलेले नाही. घाटकोपर पूर्व हा भाजपचा गड असल्याचे मानले जाते.

एवढेच नाही तर भाजप मधील अजून एक बड्या नेत्यांमधील विनोद तावडे यांना सुद्धा भाजपकडून अद्याप तिकिट देण्यात आलेले नाही. तावडे हे बोरिवली विभागातील आमदार आहेत. मुख्यमंत्री पदासाठी नावाचा मुद्दा उपस्थित केला जातो त्यावेळी तावडे यांचे नाव जरुर घेतले जाते. तर 1980 पासून भाजपला या ठिकाणी विजय मिळत आला आहे. अशामध्येच तावडे यांना उमेदवारी जरी दिली नाही तरी भाजपचे मोठे नुकसान होणार नाही आहे. पण तावडे यांना उमेदवारी दिली तर त्यांच्यासाठी तो एक मोठा संदेश असणार आहे.(Maharashtra Assembly Elections 2019: पुणे, नाशिक, नवी मुंबई व नागपूरमधून शिवसेना हद्दपार; भाजपच्या खात्यात सर्व जागा)

काँग्रेस सोडून स्वाभिमानी पक्ष स्थापन केलेले नारायण राणे यांना भाजपकडून राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले आहे. पण नारायण राण यांना भाजपने त्यांचा मुलगा नितेश राणे याला कणवली येथून तिकिट द्यावे अशी अपेक्षा आहे. बुधवारी नारायण राणे यांनी नितेश राणे यांना भाजप दुसऱ्या यादीत तिकिट देणार असल्याचा दावा केला होता. मात्र दुसऱ्या यादीत नितेश राणे यांना सुद्धा डच्चू देण्यात आला आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 4 ऑक्टोंबर ही शेवटची तारीख आहे. आज संध्याकाळ पर्यंत पक्षाकडून उमेदवारी अर्ज जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच कोणत्या बड्या नेत्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली आहे किंवा डच्चू देण्यात आला आहे हे स्पष्ट होणार आहे.