Ramdas Kadam On Shiv Sena: एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाचवली, उद्धव ठाकरे यांनी दोन पावले मागे यावे- रामदास कदम
Ramdas Kadam | (Photo Credit - Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत गेल्यानंतर शरद पवार शिवसेना (Shiv Sena) संपवत होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे शिवसेना वाचली. सर्व आमदारांच्या भावना विचारात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाठिमागे यावे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडताना डोळ्यांना पाहावत नाही. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा समेट घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न करु. न्यायालयीन लढाई संपल्यानंतर आपण हे सर्व प्रयत्न करु, असे रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी म्हटले आहे. रामदास कदम हे शिवसेनेचेचे आक्रमक आणि वरिष्ठ नेते होते. नुकताच त्यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला आहे. रामदास कदम हे एकनाथ शिंदे गटासोबत गेले आहेत. रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम हे देखील आगोदरच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत.

रामदास कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केले. शिवसेना पक्षासोबत 52 वर्षे राहिलो. शिवसेना वाढविण्यासाठी जीवाचे रान केले. असे असताना आम्हाला हे दिवस पाहायला लागले. माझा मुलगा शिवसेना आमदार असतानाही त्याला त्रास देण्यात आला. राष्ट्रवादीने शिवसेना संपविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पक्ष फुटायला आला फुटला तरीही उद्धव ठाकरे साहेब शरद पवार यांना सोडायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे यांनी आमदार का फुटले याबाबत विचार करायला पाहिजे. (हेही वाचा, Sanjay Raut On CM: अमित शहांचा दबाव आमच्यावरही होता, मात्र आम्ही घाबरलो नाही, संजय राऊतांचे विधान)

प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास कदम भाऊक झाले. रामदास कदम यांनी या वेळी आपल्या आयुष्यातील शिवसेनेच्या प्रवासाबाबत भाष्य केले. शिवसेना वाढविण्यासाठी आपण जीवाचे रान केले आहे. मी एकट्यानेच नव्हे तर अनेक नेत्यांनी हे केले आहे. अनेकांनी अंगावर केसेस घेतल्या आहेत. अनेकांना तुरुंगवास झाला. काही तुरुंगात मेले. काहींना पोलिसांनी मारले. काहींवर आजही केसेस सुरु आहेत. बेळगावमधील एका केसमध्ये काही दिवसांपूर्वीच 10 लाख रुपये भरुन अटकपूर्व जामीन मिळवला आहे. आजही हे सुरुच आहे. त्यामुळे शिवसेनेत असे घडताना प्रचंड त्रास होतो. उद्धव ठाकरे यांनी याचा विचार करावा, असेही रामदास कदम म्हणाले. (हेही वाचा, Bhaskar Jadhav Appeal to Eknath Shinde: भास्कर जाधव यांचे एकनाथ शिंदे यांना आवाहन 'शिवसेनेसाठी दोन पावले पाठी या')

मंत्री असताना प्लॅस्टीक बंदी मी केली. तो निर्णय मी घेतला. क्रेडीट मात्र आदित्य ठाकरे यांना दिले गेले. आदित्य ठाकरे यांनाही आजकाल साहेब म्हणावे लागते अशी खंतही रामदास कदम यांनी व्यक्त केली.