Marriage (PC - Pixabay)

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता राज्यात अनेक ठिकाणी हुंडा आणि हुंडाबळीची प्रकरणं समोर आली आहेत. हुंड्याचं लोण ग्रामीण भागातून आता शहरी भागातही आलं आहे. मुंबई मध्ये एका महिलेने नवरा आणि सासरच्या मंडळीं विरोधात शारिरीक आणि मानसिक शोषणाची तक्रार केली आहे. तक्रारीमध्ये हुंडा मागितल्याचा आणि मुलगी झाल्यावर मारहाण केल्याची नोंद करण्यात आली आहे. पीडितेने लग्नानंतर प्रचंड मानसिक त्रास झाल्याचं सांगितलं आहे. तर कोट्यवधींचे दागिनेही सासरच्या मंडळींनी हडपल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

2021 मध्ये या महिलेचे लग्न झाले होते. मुलीच्या कुटुंबाने थाटामाटात लग्न केले. लग्नात साधारणपणे 4.75 कोटी रुपये किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने भेट म्हणून देण्यात आले. लग्नानंतर महिला मुंबईतील महालक्ष्मी भागात राहायला आली. मात्र या महिलेला लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून त्रास सुरू झाला. प्रत्येक सणाच्या वेळी आणि कौटुंबिक सोहळ्यामध्ये महिलेच्या पालकांकडे भेटवस्तूंची मागणी केली जायची. त्यांना हव्या असलेल्या वस्तू न मिळाल्यास महिलेला टोमणे मारले जात होते. या महिलेला तिच्या गरोदरपणाच्या काळातही मानसिक त्रास देण्यात आला. Urban Dowry Harassment Cases: केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरातही हुंड्यासाठी महिलांचा छळ; मुंबई-पुण्यात वाढली प्रकरणे .

नातू हवा या हट्टापायी मुलगी झाल्यानंतर ही पीडीतेला त्रास देण्यात आल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे. सध्या ही पीडीत महिला माहेरी आली आहे. मुंबईत दिंडोशी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. तक्रारीमध्ये हर्षवर्धन जैन, नरेंद्र जैन आणि निर्मला जैन यांचा समावेश आहे. पोलिस लवकरच त्यांचे जबाब नोंदवून घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.