Doctors On Strike In Maharashtra: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांकडून विविध मागण्यांसाठी आज चोवीस तास काम बंद आंदोलन
Doctors | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

राज्य सरकारने आपल्या विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे आजपासून काम बंद आंदोलन (Doctors On Strike) सुरु आहोत आहे. हे आंदोलन 24 तास चालणार आहे. शासकीय महाविद्यालयातील (Government Medical Colleges in Maharashtra) आणि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी विविध मागण्यांसाठी 7 एप्रिलपासूनच काळ्या फिती लावून काम करत आहेत. दरम्यान, शासनाने आपल्या मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत तर राज्यभरातील सर्व शासकीय महाविद्यालयात काम बंद आंदोलन करणार आहे. हे आंदोलन करुनही जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मग येत्या 22 एप्रिलपासून नाईलाजास्तव बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेने दिला आहे.

दरम्यान, बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देताना वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेने म्हटले आहे की, आम्हााल रुग्ण अथवा प्रशासनास कोणत्याही प्रकारे वेटीस धरायचे नाही. परंतू, आमच्या मागण्यांकडे वारंवार केले जाणारे दुर्लक्ष, दाखवली जाणारी उदासीनता आणि हेळसांड पाहता आम्हाला हे पाऊल अतिशय नैराश्येतून उचलावे लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. (हेही वाचा, New Restrictions in Maharashtra: राज्यात कोरोना विषाणूबाबत नवीन निर्बंध सुरु; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश)

  • काय आहेत मागण्या?

    शासकीय मेडिकल कॉलेजमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्‍वरूपी करण्यात यावे.

  • सातवा वेतन आयोग लागू करावा.
  • हे पद मंजूर व कायमस्‍वरूपीच असल्‍याने या निर्णयाचा शासनावर कोणताही आर्थिक भारही पडणार नाही.

कोरोना व्हायरस संकट काळात शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्सनी नेहमीच काळजीपूर्वक आणि जबाबदारीने सेवा दिली आहे. वैद्यकीय अधिकारी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्‍णालयातील महत्त्वाचे पद असते. या डॉक्टर्सनी कोरोना काळात एकही सुट्टी घेतली नाही. इतकेच काय त्यांनी कुटुंबासाठीही वेळ दिला नाही. यात काही डॉक्टर्स कोरोना संक्रमित झाले. उपचार घेऊन बरे झाल्यावर पुरेशी विश्रांतीही न घेता डॉक्टर पुन्हा सेवेत रुजु झाले. असे असतानाही डॉक्टरांच्या मागणीकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जाते आहे. त्यामुळे आम्हाला काम बंद आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहात नाही, असे डॉक्टरांची संघटान सांगते.