'आरोप करणाऱ्यांवर मोफत वैद्यकीय उपचार करावेत'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला
Uddhav Thackeray | (Photo Credit: Twitter)

विरोधी पक्ष भाजपवर तोंडसुख घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शनिवारी त्यांचे कॅबिनेट सहकारी आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना सांगितले की, त्यांच्यावर आणि राज्य सरकारवर आरोप करणाऱ्यांना मोफत वैद्यकीय उपचार देण्यात यावेत. थप्पड मारणे आणि मारून घेणे हा राजकारण्यांच्या जीवनाचा भाग असतो आणि त्यामुळे जेव्हा कोणी त्यांची स्तुती करतो तेव्हा ते नर्व्हस होतात, असेही ते म्हणाले. जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे बोलत होते. टोपे यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमाला हजेरी लावली.

कार्यक्रमादरम्यान त्यांची स्तुती करत कोणीतरी ऐकवलेल्या कवितेचा संदर्भ देत ठाकरे यांनी एका हिंदी चित्रपटातील संवाद उद्धृत केला. ते म्हणाले, ‘थप्पड से डर नहीं लगता, प्यार से लगता है.’ यावेळी ते म्हणाले थप्पड खाणे आणि थप्पड देणे हा राजकारण्यांचे जीवनाचा भागच आहे, त्यामुळे कोणी माझी स्तुती केली तर मी घाबरून जातो. पण मला माहित आहे की विरोधकांनी स्तुती करणे हे माझ्या जवळच्या लोकांनी कौतुक करण्यापेक्षा वेगळे आहे.‘

भाजपाने ठाकरे सरकारविरोधात आरोप केले आहेत. करोना काळात राज्य सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपांवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. कोरोना महामारीच्या काळात टोपे यांच्या कार्याचे कौतुक करताना ठाकरे म्हणाले, ‘तुम्ही कोविड केंद्रांना भेटी देत सर्वत्र व्यवस्थित ​​औषधांचा पुरवठा होईल याची काळजी घेतलीत. परंतु विरोधक आरोप करतच आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना पोटदुखी व मळमळीचा त्रास आहे. त्यांच्यावर सरकारी दवाखान्यात मोफत उपचार करा. विरोधात असले तरी त्यांच्यावर उपचार करणे ही आमची जबाबदारी आहे.’ (हेही वाचा: Wine Sales: अण्णा हजारेंच्या उपोषणाच्या धमकीनंतर महाराष्ट्र सरकार दुकानांमध्ये वाइन विकण्याची योजना मागे घेण्याच्या तयारीत)

त्यांनी पुढे सांगितले की, या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहायचे होते, पण काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यातून हळूहळू ते बरे होत आहेत व त्यामुळे ते कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत.