Aaditya Thackeray On Yashwant Jadhav Diary: यशवंत जाधव, मातोश्री, घड्याळ भेट यांवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे युवासेना प्रमुख आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज (29 मार्च) कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राजापूर येथे प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. सध्या प्रसारमाध्यमांतून चर्चेत असलेल्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्याबद्दल विचारले असता आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, यशवंत जाधव यांनी त्यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर खुलासा केला आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्व अफवा आहेत. अफवांच्या आधारे देण्यात आलेल्या वृत्तांवर काय आणि किती प्रतिक्रिया द्यायच्या यालाही काही मर्यादा असतात, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात एक कथीत डायरी सापडल्याची चर्चा आहे. या डायरीत 'मातोश्री'ला दोन कोटी रुपये आणि 50 लाख रुपयांचे घड्याळ दिल्याची माहिती पुढे आली आहे.

सध्याच्या काळात अनेक अफवा पसरवल्या जातात. आपल्यालाही याची कल्पना आहे. त्यामुळे आफवांच्या आदारांवर आलेल्या बातम्यांवर प्रतिक्रिया किती द्यायची यावर मी मर्यादा पाळतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, आफवांच्या बातम्या पाढवल्या जात आहेत. मी त्याकडे लक्ष देत नाही. परंतू, यंत्रणांचा जो गैरप्रकार सुरु आहे तोही भयानक असल्याचे ते म्हणाले. (हेही वाचा, Aaditya Thackeray Birthday Special: राजकारणाच्या पलिकडे आदित्य ठाकरे हे नाव काय आहे? काव्यसंग्रह ते Youtube Video पर्यंत जाणुन घ्या माहित नसलेल्या गोष्टी)

केंद्रीय यंत्रणा मातोश्रीच्या दरवाजापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरु झाली आहे, याबातब विचारलेअसता आदित्य ठाकरे म्हणाले, 'हे राजकीय षडयंत्र आहे. देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी भाजपचे सरकार नाही त्या त्या ठिकाणी असे उद्योग सुरु आहेत. पण आम्हाला न घाबरता अशा गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे. काही झाले तरी टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ज्या ज्या ठीकाणी गैरवापर करुन मागे लागत आहेत त्या त्या ठिकाणी तोंडावर पडत आहेत. मग ते महाराष्ट्र असो किंवा पश्चिम बंगाल.'

दरम्यान, भविष्यात कधी शिवेसना-भाजप युती होईल का? असे विचारले असता सध्या हा विषय तितका मोठा नाही. देशात आज अनेक विषय आहेत. वाढती महागाई, बेरोजगारी यांसारखे विषय आहेत. या विषयांवर चर्चा होऊ नये यासाठी इतर मुद्दे उपस्थित केले जात आहेत. तुमच्यावर कोणी अन्याय, जबरदस्ती करत असेल तर तुम्ही त्यांच्याशी मैत्री करणार का? असा प्रतिसवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.