Coronavirus: वुहान शहरातून एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानातून 323 भारतीय दिल्लीमध्ये दाखल
Air India flight carrying 323 Indians (PC - ANI)

Coronavirus: चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानातून  (Air India Flight) रविवारी वुहान (Wuhan) शहरातून रविवारी 323 भारतीय आणि मालदिवच्या 7 नागरिकांना दिल्लीत आणण्यात आलं आहे. त्यामुळे आतापर्यंत 654 भारतीयांना चीनमधून भारतात आणण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये 304 जणांचा मृत्यू झाला असून 14 हजार 380 जणांना या विषाणूची लागण झाली आहे.

चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्त्री यांनी याबाबत टि्वट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाने वुहान येथून 323 भारतीय आणि मालदिवच्या 7 नागरिकांना घेऊन उड्डाण केलं आहे, असंही मिस्त्री म्हणाले. तसेच मी हुबेई प्रांताचे स्थानिक अधिकारी आणि प्रवाशांचेही आभार मानतो. त्यांनी केवळ 96 तासांमध्ये आव्हानात्मक परिस्थितीत आम्हाला सहकार्य केले. सध्या 25 भारतीय स्वसंमतीने चीनमध्येच थांबले असल्याचे मिस्त्री यांनी सांगितले. तसेच हुबेई प्रांतात अजूनही 100 भारतीय असू शकतात, असंही मिस्त्री यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: केरळात पुन्हा कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळला; उपचार सुरु)

मिस्त्री यांनी एएनआय वृत्तसंस्थेला याबाबत माहिती देताना सांगितले की, सध्या 4 भारतीयांना ताप असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे 323 प्रवाशांना घेऊन विमानाने उड्डाण केलं आहे. हे विमान शनिवारी सकाळी चीनमधून भारताकडे रवाना झाले होते.