UP Assembly Election Result 2022: जाणून घ्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विजयाची महत्वाची कारणे; कोणत्या मुद्द्यांवर CM Yogi Adityanath यांनी दिली Akhilesh Yadav यांना मात  

समाजवादी पक्ष आणखी एका गोष्टीत भाजपच्या मागे पडला आणि तो म्हणजे बड्या नेत्यांची संख्या. भाजपबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह अमित शहा, राजनाथ सिंह, जेपी नड्डा आणि योगी आदित्यनाथ यांच्या रूपातील मोठे चेहरे होते

UP Assembly Election Result 2022: जाणून घ्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विजयाची महत्वाची कारणे; कोणत्या मुद्द्यांवर CM Yogi Adityanath यांनी दिली Akhilesh Yadav यांना मात  
Narendra Modi & Yogi Adityanath (Photo Credit - Twitter)

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) संपूर्ण राजकीय चित्र काही तासांत स्पष्ट होईल. येत्या पाच वर्षांत राज्याची कमान कोणाच्या हाती आहे, हे लवकरच कळेल. पण याआधी जे ट्रेंड येत आहेत त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतीय जनता पार्टी (BJP) यूपीमध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू शकते. आता प्रश्न असा पडतो की सर्व प्रतिकूल आव्हाने असतानाही योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यावर कशी मात दिली? किंवा यूपीमध्ये भाजपच्या पुनरागमनासाठी नक्की कोणत्या मुद्द्यांवर जनतेने त्यांना कौल दिला?

सहा महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये ही एकतर्फी लढत होती. म्हणजे योगी आदित्यनाथ पुन्हा निवडणूक जिंकतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण लवकरच संपूर्ण खेळ बदलला. निवडणुका जवळ येऊ लागल्यावर भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाले. योगींच्या तीन मंत्र्यांसह एकापाठोपाठ एक अशा 11 आमदारांनी पक्ष सोडला. सर्वांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. परंतु आता चित्र पुन्हा पालटले आहे. जाणून घ्या नक्की काय घडले-

कोरोनाच्या काळात तीन वर्षे भाजप सरकार प्रत्येक गरिबांना मोफत रेशन देत होते. गावा-गावातील लोकांनी त्याचे कौतुक केले. पीएम मोदी आणि सीएम योगी नेहमीच त्यांच्या रॅलींमध्येही याचा उल्लेख करायचे. याचा फायदाही भाजपला झाला.

जनधन खाते असलेल्या महिलांना तीन महिन्यांपासून पैसे पाठवण्यात आले, त्याचाही परिणाम या निवडणुकीवर झाला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार दर चार महिन्यांनी 2 हजार रुपये म्हणजेच वार्षिक 6 हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गरिबांसाठी घरे बांधण्यासाठी अडीच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली असेल तर राज्याचा विकास वेगाने होईल, हे लोकांना पटवून देण्यात योगी आदित्यनाथ यशस्वी ठरले. महिलांनी अखिलेश यांच्या कोणत्याही आश्वासनापेक्षा योगींच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास दाखवला. निवडणूक प्रचारादरम्यान पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी यांच्यासह अनेक नेत्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची तुलना पूर्वीच्या विरोधी पक्षांच्या राजवटीत केली होती. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा जनतेसमोर ठेवला आणि कदाचित योगींच्या सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था किती चांगली आहे हे लोकांना पटवून देण्यात यशस्वी झाले.

सीएम योगी आदित्यनाथ यांनी बहुतांश रॅलींमध्ये गुंड आणि माफियांविरोधात सरकारची कारवाई सुरूच राहणार असल्याचा उल्लेख केला. कायद्यासोबतच महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. अशा स्थितीत राज्यात कायद्याचे राज्य आहे, असा आभास जनतेच्या मनात निर्माण करण्याचा भाजपने आटोकाट प्रयत्न केला.

गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपची सर्वात मोठी ताकद महिला म्हणून पुढे आली आहे. पंतप्रधान आवास योजनेपासून उज्ज्वला गॅस योजना आणि वीज योजनेपर्यंत सर्वांनी महिलांना पुढे नेण्याचे काम केले, ज्याचा फायदा भाजपला झाला. (हेही वाचा: पीएम नरेंद्र मोदींच्या राजवटीतील देशाचा राजकीय नकाशा; जाणून घ्या गेल्या आठ वर्षांत राज्यांमधील 'भाजप' सत्तेचे चित्र कसे बदलले)

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद श्रीवास्तव म्हणतात की सुमारे 70 टक्के दलित मतदार बहुजन समाज पक्षातून भाजपमध्ये गेले आहेत. समाजवादी पक्षाने बरेच प्रयत्न केले, पण त्यांना दलित मतदारांचा विश्वास मिळवता आला नाही. कारण सपा सरकार सत्तेवर असताना दलितांवरील अत्याचाराची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली होती. त्यामुळे बसपानंतर दलित मतदारांचा कोणत्याही पक्षावर विश्वास निर्माण करता आला असेल तर तो भाजप आहे.

यूपी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रँड नेमही कामी आले असावे. पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्याने मतदारांना आकर्षित केले. निवडणूक प्रचारादरम्यान, पंतप्रधान मोदींनी योगी सरकारची आधीच्या सरकारांशी तुलना करून जनतेचा विश्वास संपादित केला. यूपीतील भाजपच्या विजयाने पंतप्रधान मोदींची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

प्रचारादरम्यानच्या बहुतांश भाषणांमध्ये पंतप्रधान मोदींनी तिहेरी तलाक, गुन्हेगारी, माफिया राज संपवण्याचा उल्लेख केला. गरिबांना रेशन आणि डबल इंजिनचे फायदे नमूद करून, त्यांनी जनतेला आपल्या पक्षात घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता.

भाजपने संपूर्ण निवडणुकीत हिंदुत्व आणि विकास हे दोन्ही अजेंडे सोबत ठेवले. काशीमध्ये विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन झाले, तर जेवारसह उत्तर प्रदेशातील पाच आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या पायाभरणीचेही उद्घाटन झाले. याशिवाय गंगा एक्स्प्रेस वे, बुंदेलखंड एक्स्प्रेस वे, पूर्वांचल एक्स्प्रेस वे, डिफेन्स कॉरिडॉर, सरयू कालवा प्रकल्पाची भेटही यूपीला देण्यात आली.

समाजवादी पक्ष आणखी एका गोष्टीत भाजपच्या मागे पडला आणि तो म्हणजे बड्या नेत्यांची संख्या. भाजपबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह अमित शहा, राजनाथ सिंह, जेपी नड्डा आणि योगी आदित्यनाथ यांच्या रूपातील मोठे चेहरे होते. त्याचवेळी अखिलेश यांच्याशिवाय समाजवादी पक्षात फक्त शिवपाल यादव होते आणि तेही फारसे सक्रिय दिसले नाहीत.

समाजवादी पक्षाच्या पराभवाचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या निवडणुकीतील आश्वासनांवर जनतेचा विश्वास नसणे. 300 युनिट मोफत वीज देण्याच्या आश्वासनात मोठ्या संख्येने मतदारांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य होते, परंतु अखिलेश सरकारमधील वीज कपातीच्या आठवणी अजूनही लोकांच्या मनात ताज्या आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2022 04:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).