Coronavirus Third Wave in India: देशाला कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा धोका? पहा काय म्हणाले AIIMS Chief Randeep Guleria
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) मंदावत असताना तिसऱ्या लाटेची शक्यता सातत्याने वर्तवली जात आहे. यातच आता एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS Chief Randeep Guleria) यांनी तिसऱ्या लाटेबद्दल महत्तवपूर्ण वक्तव्य केलं आहे. कोरोना व्हायरसची तिसरी लाट (Coronavirus Third Wave) टाळणे अशक्य असून पुढील 6-8 आठवड्यांत भारतात येण्याची शक्यता गुलेरिया यांनी एनडीटीव्हीशी बोलताना व्यक्त केली आहे. (महाराष्ट्रात 2-4 आठवड्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट; टास्क फोर्सचा इशारा)

देशातील इतक्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करणे हे देशासमोरील मोठे आव्हान असून कोविशिल्ड लसीच्या डोसेसमधील वाढलेल्या अंतरामुळे अधिकाधिक लोकांचे सुरक्षित करता येईल, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, कोविड-19 विषाणूचे म्युटेशन होत असल्याने त्याच्या अभ्यास करावा लागेल. त्यासाठी कोरोना विरुद्धच्या लढ्यात नवीन रुपरेषा तयार करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

देश पातळीवर रुग्णसंख्या वाढण्यास काहीसा वेळ लागेल. पण कोविड-19 ची तिसरी लाट टाळणे अशक्य आहे आणि पुढील 6-8 आठवड्यांत ती देशात धडकेल. किंवा त्यासाठी काहीसा अधिक वेळही लागू शकतो. कोरोना नियमांचे पालन आणि गर्दी टाळणे यावर सर्व अवलंबून आहे, असेही ते पुढे म्हणाले.

गुलेरिया म्हणाले, "सध्या तरी देशातील केवळ 5 टक्के लोकांचे लसीकरण (दोन्ही डोस घेऊन) पूर्ण झाले आहे. या वर्षा अखेरपर्यंत देशातील 130 कोटी लोकांपैकी 108 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. ते सर्वात मोठे आव्हान आहे. नवी लाट येण्यास साधारणपणे तीन महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र ही लाट कमी वेळ घेईल. परंतु, हे विविध बाबींवर अवलंबून आहे. त्यासाठी आपल्याला निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे."

मागील वेळेस आपण पाहिले की, कोरोनाचा नवा वेरिएंट बाहेरुन आला आणि येथे विकसित झाला. त्यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. व्हायरसचे म्युटेशन होत आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.