राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबईमध्ये आढळून येत आहे. आज मुंबईत 114 जणांचा मृत्यू झाला असून 1269 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 64,068 वर पोहोचली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.
राज्यात आज 3827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 124331 अशी झाली आहे. आज नवीन 1935 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 62773 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 55651 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
आपल्या सैनिकांवर देशाचा अफाट विश्वास आहे. मला आमच्या सैनिकांना खात्री द्यायची आहे की संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे, असं सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
तेलंगणा मुख्यमंत्री केसी राव यांनी गलवानच्या खोऱ्यात शहीद झालेल्या संतोष बाबू यांच्या परिवाराला 5 करोड रुपयांची मदत, घर आणि 1 व्यक्तीला नोकरी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
भारताला शांतता हवी असून आपण दुबळे नाहीत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत भारत- चीन सीमारेषेबाबतच्या पार पडलेल्या व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगमध्ये म्हटले आहे.
तामिळनाडूत 2115 नव्या रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 54,449 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्याबरोबर आज दिवसभरात 41 रुग्ण दगावले असून राज्यात मृतांची एकूण संख्या 666 वर पोहोचली आहे.
भारत चीन मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्वपक्षीय बैठक सुरु आहे. यात आमचा सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचे जनता दल पक्षाचे प्रतिनिधी पिनाकी मिश्रा म्हणाले.
भारत चीन तणावपूर्ण (India_ China Disputes) परिस्थिती वरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता ही बैठक पार पडणार असून यामध्ये सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, नितीश कुमार यांच्यासहित सर्व पक्षांचे नेते सहभागी असणार आहेत. या बैठकीसाठी आरजेडी ला मात्र आमंत्रित न केल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हंटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत असताना भारत- चीन वादावर मौन सोडले होते. देशाचे 20 हुन अधिक जवान शहीद झाले आहेत, त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताला शांतता हवी आहे मात्र गरज लागल्यास आपणही जशाच तसे उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत असे मोदींनी म्हंटले होते.
दुसरीकडे, महाराष्ट्रात आज शिवसेना पक्षाचा 54 वा वर्धापन दिन साजरा करण्याची तयारी सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सेलिब्रेशन अगदी साध्या स्वरूपात आणि ऑनलाईन होणार आहे, ज्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग वरून पक्षाची पुढील वाटचाल सांगणार आहेत.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान कोरोना संबंधित अपडेट्स पाहायला गेल्यास, देशात सध्या कोरोनाचे 366946 इतके रुग्ण आहेत, तर महाराष्ट्रात 120504 इतके रुग्ण आढळले आहेत. हे आकडे रोज वाढत आहेत. मात्र अजूनही मृत्यूंची संख्या कमी असल्याने आणि रिकव्हरी रेट हा अधिक असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सरकार कडून सांगितले जातेय.