Sri Lanka: देशातील आर्थिक संकटांदरम्यान Ranil Wickremesinghe बनले श्रीलंकेचे नवे पंतप्रधान; पाचव्यांदा घेतली शपथ

महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात उग्र हिंसाचार झाला आणि विरोधकांनी माजी पंतप्रधानांचे वडिलोपार्जित घर जाळले. एवढेच नाही तर महिंदा यांचे शासकीय निवासस्थानही जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला

Ranil Wickremesinghe. (Photo Credits: Facebook)

सध्या श्रीलंका (Sri Lanka) देशाच्या इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशात आज संध्याकाळी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी गुरुवारी ज्येष्ठ नेते रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांना नवीन पंतप्रधान म्हणून शपथ दिली. रानिल विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीला (UNP) श्रीलंकेच्या 225 सदस्यीय संसदेत फक्त एक जागा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतरिम प्रशासनाचे नेतृत्व करण्यासाठी विक्रमसिंघे यांना सर्व पक्षांचा पाठिंबा आहे. त्यांची नियुक्ती 6 महिन्यांसाठी करण्यात आली आहे. विक्रमसिंघे यांनी नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यावर त्यांना बहुमत मिळेल असा विश्वास युएनपी अध्यक्ष व्ही अबेवर्देना यांनी व्यक्त केला.

देशातील सर्वात जुना पक्ष युएनपी, 2020 मध्ये एकही जागा जिंकू शकला नाही आणि यूएनपीचा बालेकिल्ला असलेल्या कोलंबोमधून निवडणूक लढवलेले विक्रमसिंघे यांचाही पराभव झाला होता. त्यांचे सहकारी सजिथ प्रेमदासा यांनी त्यांच्यापासून वेगळे होऊन एक वेगळा पक्ष एसजीबी (SJB) स्थापन केला जो मुख्य विरोधी पक्ष बनला होता. विक्रमसिंघे हे दूरदर्शी धोरणांसह अर्थव्यवस्था हाताळणारे नेते म्हणून ओळखले जातात. तसेच ते श्रीलंकेचे असे एक राजकारणी मानले जातात जे आंतरराष्ट्रीय सहकार्य देखील एकत्रित करू शकतात.

रानिल विक्रमसिंघे हे 1994 पासून युनायटेड नॅशनल पार्टीचे (UNP) सर्वेसर्वा आहेत. ज्येष्ठ राजकारणी विक्रमसिंघे चार वेळा देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. मात्र, 2019 मध्ये त्यांना अंतर्गत वाद आणि अन्य कारणांमुळे पंतप्रधानपद सोडावे लागले होते. आता पाचव्यांदा ते श्रीलंकेचे पंतप्रधान बनले आहेत.

काल संध्याकाळी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया आणि विक्रमसिंघे यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी गोटाबाया यांचे भाऊ महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. रानिल पंतप्रधान झाल्यानंतर भारतासोबतचे संबंध अधिक सौहार्दपूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा: तब्बल 2 वर्षांनतर उत्तर कोरियामध्ये आढळला कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण; सरकारने केली राष्ट्रव्यापी लॉकडाऊनची घोषणा)

भारताचा शेजारी देश आणि दक्षिण आशियाई राष्ट्र श्रीलंका सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत आहे. हा देश आपल्या 22 दशलक्ष लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहे. तेथे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. दुसरीकडे, बिकट आर्थिक संकटात असताना आता हा देशही हिंसाचार आणि दंगलींच्या आगीत जळत आहे.

महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात उग्र हिंसाचार झाला आणि विरोधकांनी माजी पंतप्रधानांचे वडिलोपार्जित घर जाळले. एवढेच नाही तर महिंदा यांचे शासकीय निवासस्थानही जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डेली मिररच्या वृत्तानुसार, रानिल विक्रमसिंघे शपथ घेतल्यानंतर कोलंबोतील एका मंदिराला भेट देणार आहेत. त्यानंतर ते आपली जबाबदारी स्वीकारतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now