Made in India Smartphones: आज भारतात विकले जाणारे 99.2 टक्के फोन 'मेड इन इंडिया'; 9 वर्षांत उत्पादन 20 पट वाढले- Minister Ashwini Vaishnaw

ज्या राज्यांमध्ये स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्याचे कारखाने सुरू आहेत, अशा कंपन्यांना राज्य सरकारे जमीन आणि वीज सवलतीसारख्या सुविधाही देत ​​आहेत. भारतात तयार होणाऱ्या स्मार्टफोनमधील परदेशी घटकही कमी होत आहेत आणि भारतीय घटकांची टक्केवारी वाढत आहे.

Ashwini Vaishnaw | Photo Credits: X)

सध्या भारतात विकले जाणारे 99.2 टक्के स्मार्टफोन 'मेड इन इंडिया' आहेत (Made in India Smartphones). गेल्या 9 वर्षात देशातील स्मार्टफोनचे उत्पादन जवळपास 20 पटीने वाढले आहे. मोबाइल फोन उत्पादन उद्योग 44 अब्ज डॉलर्स (सुमारे 3.5 लाख कोटी रुपये) वर पोहोचला आहे. केंद्रीय आयटी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. मंत्री वैष्णव म्हणाले की, भारताने 2025-26 पर्यंत $300 अब्ज किमतीचा इलेक्ट्रॉनिक उत्पादन उद्योग निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारताच्या प्रगतीत आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात निर्यातीचा मोठा वाटा असू शकतो, असेही ते म्हणतात.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्या दशकात भारतात स्मार्टफोन उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. 2014-15 मध्ये या मार्केटची किंमत फक्त 19,000 कोटी होती, आता ते 3.5 लाख कोटींच्या वर पोहोचले आहे. भारतात बनवलेले स्मार्टफोन फक्त भारतीय बाजारपेठेतच विकले जातात असे नाही, तर भारत सुमारे $11 अब्ज किमतीच्या स्मार्टफोनची निर्यातही करत आहे. स्मार्टफोन उत्पादक अॅपल देखील भारतात सतत आपल्या फोनचे उत्पादन वाढवत आहे. भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्मार्टफोन उत्पादक देश आहे.

एका अहवालानुसार 2022-23 मध्ये अॅपलने भारतात उत्पादित केलेल्या $5 अब्ज किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात केली. हा क्रम अखंड चालू राहतो. अॅपलने 2022-23 च्या संपूर्ण वर्षाच्या तुलनेत 2023-24 च्या पहिल्या सात महिन्यांत सर्वात जास्त निर्यात केली आहे. भारतातील स्मार्टफोन निर्यातीत अॅपलचा वाटा 62% आहे. अॅपलनेव्यतिरिक्त, आता कोरियन स्मार्टफोन उत्पादक सॅमसंग देखील भारताच्या निर्यातीमध्ये एक प्रमुख भागधारक आहे. सॅमसंगने भारतामधून 2022-23 मध्ये $4 अब्ज पेक्षा जास्त किमतीचे स्मार्टफोन निर्यात केले. आता गुगल सुद्धा आपला स्मार्टफोन पिक्सेल भारतात बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे.

याशिवाय, भारतीय बाजारपेठेत मोठा वाटा असलेले Xiaomi, Oppo आणि OnePlus सारखे ब्रँड देखील भारतात उत्पादन करत आहेत. पूर्वी हे सर्व ब्रँड चीनमधून आयात करून भारतात स्मार्टफोन विकायचे. उत्पादन क्षेत्रातील या बदलाचे प्रमुख कारण केंद्र सरकारची धोरणे हे देखील आहे. भारतातील स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना अनेक सवलती देण्यासाठी केंद्र सरकारची प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजना तयार करण्यात आली आहे. ही योजना स्मार्टफोन व्यतिरिक्त भारतातील संपूर्ण इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रासाठी विस्तारित करण्यात आली आहे. (हेही वाचा: OnePlus 12 अधिकृतपणे भारतीय वेबसाइटवर झाला लिस्ट, लवकरच होणार लॉन्च)

ज्या राज्यांमध्ये स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्याचे कारखाने सुरू आहेत, अशा कंपन्यांना  राज्य सरकारे जमीन आणि वीज सवलतीसारख्या सुविधाही देत ​​आहेत. भारतात तयार होणाऱ्या स्मार्टफोनमधील परदेशी घटकही कमी होत आहेत आणि भारतीय घटकांची टक्केवारी वाढत आहे. 2018-19 या वर्षात देशातून 61,090 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात झाली होती, तर 2022-23 मध्ये 1.9 लाख कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने निर्यात करण्यात आली होती. पाच वर्षांत ही वाढ जवळपास 3 पट आहे. 2023-24 मध्ये त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now