
India Natioanl Cricket Team vs England Natioanl Cricket Team: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs ENG 2nd Test 2025) 2 जुलैपासून एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे रंगणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल इतिहास रचू शकतो. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा भारतीय फलंदाज ठरू शकतो, आणि या शर्यतीत सुनील गावस्कर (Sunil Gavaskar), राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि वीरेंद्र सहवाग (Virendra Sehwag) यांसारख्या दिग्गजांनाही मागे टाकू शकतो.
2000 कसोटी धावांपासून अवघ्या 97 धावांवर
यशस्वी जयस्वालने आतापर्यंत 20 कसोटीत 1903 धावा केल्या असून त्याची सरासरी 52.86 इतकी आहे. एजबॅस्टनमध्ये तो 97 धावा केल्यास, तो 21व्या कसोटीत 2000 धावांचा टप्पा पार करेल, जोपर्यंत सुनील गावस्कर यांनी 23 कसोट्यांमध्ये ही कामगिरी केली होती. म्हणजेच जयस्वालकडे गावस्कर यांचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG 2nd Test 2025: दुसऱ्या कसोटीत सामन्यात बुमराहसह 'हे' 3 खेळाडू होऊ शकतात बाहेर, टीम इंडियामध्ये मोठे बदल निश्चित?)
डावांच्या बाबतीत द्रविड-सहवागचा विक्रमही धोक्यात
कसोटी क्रिकेटमध्ये डावांच्या आधारे सर्वात जलद 2000 धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत राहुल द्रविड आणि वीरेंद्र सहवाग अग्रस्थानी आहेत. दोघांनीही केवळ 40 डावांत हा टप्पा गाठला. सुनील गावस्कर यांनी 44 डावांत हे साध्य केलं होतं. जयस्वालने आतापर्यंत 38 डाव खेळले असून, जर त्याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 97 धावा केल्या, तर तो 49व्या डावात ही कामगिरी करणारा सर्वोत्तम भारतीय फलंदाज ठरेल.
लीड्स कसोटीत फलंदाजी शानदार, पण क्षेत्ररक्षण अपयशी
लीड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत जयस्वालने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले, पण त्याचे क्षेत्ररक्षण अतिशय निराशाजनक ठरले. त्याने दोन्ही डावांमध्ये किमान पाच झेल गमावले, ज्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोलही झाला. दुसऱ्या डावात फलंदाजीतही अपयश आलं आणि तो फक्त 4 धावांवर बाद झाला.
एजबॅस्टनमध्ये जयस्वालकडून काय अपेक्षा?
दुसऱ्या कसोटीत यशस्वी जयस्वालवर सर्वांच्या नजरा असतील. त्याच्याकडे केवळ विक्रम करण्याची संधीच नाही, तर पहिल्या सामन्याच्या चुका दुरुस्त करून आपली सर्वांगीण कामगिरी सिद्ध करण्याची जबाबदारीही असेल.