Roger Binny On shahid Afridi: शाहिद आफ्रिदीच्या बेताल वक्तव्यावर रॉजर बिन्नीने दिलेले सडेतोड उत्तर, म्हणाले...
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) मोठे वक्तव्य करताना खुद्द आयसीसीवरच आरोप केला की, आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारताची बाजू घेत आहे.
टी-20 विश्वचषकात (T20 WC 2022) बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा (IND vs BNG) 5 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताच्या विजयाने पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये खळबळ उडाली आहे. भारताचा हा विजय जणू पाकिस्तानच्या पचनी पडत नाही. खरे तर भारताच्या या विजयानंतर पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला. सामन्यात पावसापूर्वी बांगलादेशचा संघ मजबूत स्थितीत होता. मात्र पावसानंतर भारताने पुनरागमन करत सामना जिंकला. या संदर्भात पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) मोठे वक्तव्य करताना खुद्द आयसीसीवरच आरोप केला की, आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारताची बाजू घेत आहे. यावर आता बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी शाहिद आफ्रिदीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले बीसीसीआय प्रमुख
रॉजर बिन्नी म्हणाले की "मला वाटत नाही की आयसीसी आमची बाजू घेतो. ते प्रत्येकाशी सारखेच वागतात. तुम्ही असे म्हणू शकत नाही. आम्हाला इतर संघांपेक्षा वेगळे काय आहे? ? भारत हे क्रिकेटमधील मोठे शक्तीस्थान आहे. पण आपल्या सर्वांना समान वागणूक दिली जाते." रॉजर बिन्नीच्या या उत्तराने शाहिद आफ्रिदीला कडक संदेश दिला असावा. (हे देखील वाचा: SL vs ENG: श्रीलंकेच्या विजय-पराजयावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे उपांत्य फेरीसाठी ठरणार भवितव्य, आज गट 1 मधील सर्वात मोठा सामना)
काय म्हणाला शाहिद आफ्रिदी
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर एका टीव्ही कार्यक्रमात शाहिद आफ्रिदी म्हणाला की, "आयसीसीला कोणत्याही किंमतीत भारताला उपांत्य फेरीत नेण्याची इच्छा आहे. मैदान ओले असतानाही सामना पुन्हा सुरू झाल्याचे तुम्ही पाहिले." शाहिद आफ्रिदीने पंचांवर फसवणूक केल्याचा आरोपही केला. तो म्हणाला की, "भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात त्याच पंचांनी काम केले होते. तुम्ही पाहा आयसीसी त्याला सर्वोत्कृष्ट पंचाचा पुरस्कार देईल."