
IND vs ENG: भारतीय संघाचा (Team India) अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी तो उपलब्ध असेल याची पुष्टी केली आहे. त्याच्या तंदुरुस्तीबद्दल शंका उपस्थित होत असताना बुमराहने (Jasprit Bumrah) म्हटले आहे की तो पहिल्या सामन्यात खेळण्यास तयार आहे. त्याने असेही सांगितले की त्याची रणनीती मालिकेत तीन सामने खेळण्याची आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होत आहे.
एका स्पोर्ट्स चॅनेलसाठी दिनेश कार्तिकशी झालेल्या संभाषणात, बुमराहने त्याच्या वर्कलोड व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली आणि तो म्हणाला की तो पहिल्या सामन्यात नक्कीच खेळेल, तर इतर सामन्यांमध्ये त्याची उपलब्धता सामन्याच्या परिस्थितीवर आणि तो किती शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्ती यावर अवलंबून असेल. बुमराह म्हणाला, मी निश्चितपणे तीन कसोटी सामने खेळण्याचा विचार करत आहे. सध्या तरी हाच प्लॅन आहे. अर्थात, नेमका आकडा अजून निश्चित झालेला नाही, पण मी पहिल्या कसोटीत नक्कीच उपलब्ध असेन.
बुमराहचा अनुभव महत्त्वाचा
या दौऱ्यात, शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करेल आणि बुमराह गोलंदाजी विभागात सर्वात अनुभवी खेळाडू असेल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत, बुमराहचा अनुभव संघासाठी आणखी महत्त्वाचा बनतो. बुमराह हा कसोटी कर्णधार म्हणून पाहिले जाणाऱ्या खेळाडूंमध्ये होता. रोहितच्या अनुपस्थितीत बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे नेतृत्व केले होते. परंतु त्याच्या जागी गिलला ही जबाबदारी देण्यात आली होती. गेल्या काही वर्षांपासून बुमराह दुखापतींशी झुंजत आहे आणि दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या सामन्यातून माघार घ्यावी लागली होती.