Fact Check: रेशन खरेदी करण्यासाठी गरिबांना जबरदस्तीने तिरंगा घेण्यास भाग पाडले जात आहे? जाणून घ्या सत्य
राशन घेण्यासाठी तिरंगा घेण्याबाबतची कोणतीही सूचना भारत सरकारकडून देण्यात आलेली नाही.
सध्या देशात स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी होत आहेत. या पार्श्वभुमीवर सरकार ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवत आहे. देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार गरिबांवर तिरंगा खरेदीसाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला जात आहे. या व्हिडिओमध्ये अनेकांनी आरोप केला आहे की, जेव्हा ते राशन घेण्यासाठी दुकानात गेले तेव्हा त्यांना 20 रुपयांचा राष्ट्रध्वज विकत घेण्यास भाग पाडण्यात आले. अनेक माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.
आता सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पीआयबीने सांगितले आहे की, हा दावा खरा नाही. राशन घेण्यासाठी तिरंगा घेण्याबाबतची कोणतीही सूचना भारत सरकारकडून देण्यात आलेली नाही. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन आणि तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडल्याने हे रेशन दुकान निलंबित करण्यात आले आहे.