कुर्ला: राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात शिरले नाल्याचे पाणी, शिवसेनेने करून दाखवलं म्हणत व्यक्त केली नाराजी
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी जवळच्या नाल्यातील पाणी शिरले होते. याचे फोटो शेअर करत त्यांनी महापालिका, शिवसेना व मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरुद्ध नाराजीचा सूर धरला आहे.
मागील आठवड्यापासून मुंबईवर अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे, यामध्ये मुंबईकर नागरिकांचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे.विशेष म्हणजे एरवी आपत्तीच्या काळात तुलनेने आरामदायक जीवन जगणाऱ्या नेते मंडळींना सुद्धा पावसाचा त्रास चांगलाच भोवला आहे. सकाळीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांचे निवासस्थान मातोश्री (Matoshree) जवळ पाणी साचल्याचे वृत्त समोर आले होते, त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते (NCP Spokeperson) नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याही घरात जवळच असलेल्या नाल्याचे पाणी भरल्याचे समजत आहे. मलिक यांच्या कुर्ल्याच्या राहत्या घरात साधारण गुढघ्यापर्यंत पाणी साचले होते, याचे फोटो आपल्या ट्विटर अकाउंट अरुण शेअर करत त्यांनी धन्यवाद बीएमसी अशा शब्दात पालिकेला टोला लगावला आहे.
नवाब मलिक ट्विट
या संदर्भात माध्यमांशी बोलताना, नवाब मलिक यांनी पालिकेसह मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर देखील निशाणा साधला होता. मुंबईत सध्या पावसाने थैमान घातले आहे, जागोजागी पाणी साचून आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली होती मात्र यावर महापौरांनी मुंबईत पाणी साचलेलंच नाही असे विधान केले होते, यावर नवाब यांनी महापौर आहेत की महापूर अशी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे . वास्तविक पाहता पालिकेने सुद्धा मान्सूनपूर्व काळात आपली पूर्ण तयारी झाल्याचा विश्वास दर्शवला होता मात्र हा दावा सुद्धा फोल ठरल्याने पालिकेला जनतेची काळजी आहे असे दिसत नाही असा आरोप नवाब यांनी केला आहे.
दरम्यान मुंबई व उपनगरात आता काही ठिकाणे पावसाने विश्रांती घेतली आहे ,मात्र वेधशाळेच्या अंदाजानुसार या आठवड्ययात सुद्धा पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.