Uddhav Thackeray Malegaon Sabha: उद्धव ठाकरे मालेगाव सभा, स्वागतासाठी 'उर्दू भाषेत' बोर्ड, 'जनाब' असाही उल्लेख; राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला
Uddhav Thackeray | (Photo Credit: Facebook)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Malegaon Sabha) यांची आज मालेगाव (Malegaon) येथे जाहीर सभा पार पडते आहे. खेड येथील सभा नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दमदार पाड पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. त्या जोरावर आज मालेगाव येथे उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. खास करुन मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बोर्ड उर्दू भाषेत लागले आहेत. यावरही ठाकरे काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे. शिवसेना पक्षात पडलेली फूट आणि एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने बहाल केलेले शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे राज्यव्यापी दौरे करत असलेले उद्धव ठाकरे आजच्या सभेतून काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार आणि विद्यमान मंत्री दादा भूसे यांच्या बालेकिल्ल्यात आजची सभा पार पडते आहे. त्यामुळे दादा भूसे यांच्यावर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेसाठी जय्यत तयारी झाली आहे.

मालेगाव येथील एमएसजी कॉलेज मैदानावर ही सभआ पार पडत आहे. सभेच्या निमित्ताने ठाकरे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मालेगावमध्ये उर्दू भाषेत बोर्ड झळकले आहेत. यावर विरोधकांकडून जारदोर टीका होत आहे. उद्धव ठाकरे यांचा जनाब म्हणूनही उल्लेख केला जातो आहे. यावर उर्दू ही भारतीय भाषा आहे. अनेक लेखक, कवी उर्दू भाषेतच लिहीतात. कौतुक केले जाते ते जावेद आख्तर, गुलजार हेसुद्धा उर्दू भाषेतच लिहीतात. त्यामुळे उर्दु भाषेत बोर्ड झळकल्याबद्दल कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi's Disqualification as MP: चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे, राहुल गांधीची खासदारकी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया)

उद्धव ठाकरे यांची मालेगाव येथील जाहीर सभा मंत्री दादा भूसे यांच्या बालेकिल्ल्यात होत आहे. दादा भूसे हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जात. परंतू, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. त्यामुळे आजच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी गिरणा साखर कारखान्यासाठी जमवलेल्या शेअर्समध्ये पालकमंत्री दादा भूसे यांनी तब्बल 178 कोटी शेअर्सचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.