शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर पहिली प्रतिक्रिया 'आज बाळासाहेब हवे होते'
Shiv Sena MP Arvind Sawant | (Photo Credits-Twitter)

शिवसेना (Shiv Sena) खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. केंद्रातील भाजप (BJP) प्रणित एनडीए (NDA) सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणारे ते शिवसेनेचे एकमेव खासदार ठरले आहेत. मंत्री म्हणून शपथ घेतल्यावर अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सावंत यांना अश्रू अनावर झाले. मी शपथ घेत असताना आज बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) हवे होते. त्यांच्या चरणावर डोकं ठेवण्यात प्रचंड मोठा आनंद झाला असता, अशी भावना मंत्री अरविंद सावंत यांनी बोलून दाखवली.

पुढे बोलताना अरविंद सावंत म्हणाले, सर्व काही उभारायचे मात्र उभारलेल्या कामाचा लाभ स्वत: कधीच घ्यायचा नाही, अशी ठाकरे कुटुंबीयांची खासियत आहे. माझ्या विजयात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे आणि तळागाळातील शिवसैनिकाचा समावेश आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच मी इतक्या मताधिक्यामुळे विजयी होऊ शकलो. खरे तर, मी विजयी होईल असे कुणालाही वाटत नव्हते. मला लोकांनी खिजगणीतही धरले नव्हते. काही लोक म्हणायचे हा पराभूत होणार, काही म्हणायचे थोड्याफार फरकाने निवडूण येईल. प्रत्यक्षात मात्र मी एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झालो. आज प्रचंड आनंद होतो आहे, अशी भावनाही अरविंद सावंत यांनी व्यक्त केली. (हेही वाचा, BJP Led NDA 2 Modi Cabinet: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित NDA 2 सरकार मंत्रिमंडळ संपूर्ण यादी, मंत्र्यांच्या नावासह)

दरम्यान, शिवसेना खासदार अरविंद गणपत सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अरविंद सावंत हे भाजप प्रणित NDA 2 सरकारमधील शिवसेनेचे शपथ घेणारे पहिले आणि एकमेव खासदार आहेत. शिवसेना हा भाजपचा खूप जूना मित्र आहे. हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणूक 2019 युती द्वारे एकत्र लढले होते. एकत्र निवडणूक लढण्याचा दोन्ही पक्षांना मोठा फायदा झाला. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उमेदवार निवडूण आले.