Ratnagiri Rain Update: मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे ठप्प; रत्नागिरीतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

कोकणात सध्या पावसाचे रौद्र रुप पहायला मिळत आहे. नद्यांना पूर आला आहे. रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. धोकादायक परिस्थीती पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर केली आहे.

Photo Credit - X

Ratnagiri Rain Update: गेल्या आठवड्याभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड(Ratnagiri Rain News)जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी 15 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयांचा समावेश आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जारी केला आहे. कोकणात रस्त्यांना देखील नदी-नाल्याचे स्वरुप आले आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नारंगी नदीला पूर आला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. (हेही वाचा:Kokan Rain News Update: कोकणात मुसळधार पाऊस,रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट )

कोकण रेल्वे ठप्प

जोरदार पावसामुळे खेडनजीक दरड कोसळली. त्याचा परिणाम म्हणून कोकण रेल्वेची वाहतूक रविवारीपासून ठप्प झाली आहे. 13 पेक्षा अधिक तास उलटूनही कोकण रेल्वेचे प्रवासी अडकून काही ठिकाणी अडकून पडले आहेत. कोकण रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी एक्स्प्रेस ट्रेन जागच्या जागी उभ्या आहेत. कोचीवेल्ली एक्स्प्रेस ट्रेन गेल्या 13 तासांपासून चिपळूण स्थानकात उभी आहे. सुरुवातीला प्रवाशांना ही ट्रेन 4 तास उशिराने धावणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अजूनही ही एक्स्प्रेस ट्रेन चिपळूण स्थानकातच उभी आहे.

शाळा महाविद्यालयांना सुट्टी

अंगणवाडी, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयांचा समावेश आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टीचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जारी केला आहे. हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरुन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेवून संपूर्ण जिल्ह्याकरिता शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणात नद्यांना पूर

संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. चिपळूण येथील वाशिष्ठी नदी, राजापूर येथील कोदवली नदी, लांजा येथील मुचकुंदी नदी यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जारी करण्यात आली आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात कोंड, आंबेड-डिंगणी- कर्जुवे, धामणी, कसबा, फणसवणे भागात जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर पाणी भरलंय. त्यामुळे या भागांमधली वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीतील खेड-दिवाणखवटी येथे नदीला पूर आला असून सात गावांचा संपर्क तुटला आहे. गणेशवाडीतील सात वाड्यांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement