बायकोची हत्या करुन प्रेयसीचा खून; दुहेरी हत्याकांडाने सातारा हादरलं
Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

सातारा (Satara) जिल्ह्यातील वाई (Wai) तालुक्यातील व्याहळी येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. बायकोच्या हत्येनंतर प्रेयसीचा खून करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. नितीन गोळे (38) असे या आरोपीचे नाव असून प्रेयसीच्या खून प्रकरणाची चौकशी करताना त्याने स्वत:च्या बायकोची हत्या केल्याची कबुली दिली आहे. (Navi Mumbai Shocker: नवी मुंबईत जन्मदात्या आईची हत्या, पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या 15 वर्षाच्या मुलीला अटक)

संध्या विजय शिंदे (34) ही महिला सातारा येथून बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे आली होती. 31 जुलै रोजी रात्री दहा वाजल्यापासून ही महिला बेपत्ता होती. दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऊसाच्या शेतात एक मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे हात बांधलेले होते आणि तोंडावरही जखमा होत्या. त्यामुळे ही हत्याच असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता.

संध्या शिंदे यांचा खून नितीन गोळे यांनी केला असल्याची तक्रार संध्या यांच्या नातेवाईकांनी केली होती. तसंच आरोपीला अटक करण्याची मागणी ते करत होते. त्यानंतर मोबईल लोकेशनच्या आधारे विशेष पथकाद्वारे तपास सुरु झाला. मात्र रात्रंदिवस प्रयत्न करुनही आरोपीपर्यंत पोहण्यास अपयश येत होते.

9 ऑगस्ट रोजी आरोपी कर्नाटक मधील बेळगाव परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान संध्या शिंदे यांच्या खूनाची कबुली आरोपीने दिली. तसंच स्वत:ची पत्नी मनिषा गोळे (35) हिचा देखील 1 मे 2019 मध्ये खून करुन मृतदेह पुरून टाकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी गोळे यांना आज वाईच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वी साताऱ्यामधील वाई तालुक्यातील धोम येथील संतोष पोळ यांनी 6 महिलांचा खून केल्याची घटना समोर आली होती. या महिलांचे मृतदेह त्याने घरसमोरील अंगण आणि फार्म हाऊसमध्ये गाडले होते.