Sambhaji Bhide on Pandharpur Ashadi Wari: 'पंढरपूर आषाढी वारीस परवानगी द्या, देशातील नव्हे तर जगातील करोना नामशेष होईल'-संभाजी भिडे
Sambhaji Bhide | (Photo Credit: Facebook)

आपल्या चमत्कारीक आणि वादग्रस्त विधानांनी सतत चर्चेत असणाऱ्या संभाजी भीडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा असेच विधान केले आहे. सांगली येथील शिवप्रतिष्ठान नामक संघटनेचे संभाजी भीडे यांनी म्हटले आहे की, पंढरपूर आषाढी वारीस परवानगी देण्यात यावी. आषाढी पायी वारी (Pandharpur Ashadi Wari) झाल्यानंतर भारतच काय अवघ्या जगातील कोरोना (Coronavirus) नामशेष होईल असे काहीसे अजब विधान भिडे यांनी केले आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नावा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या आधीही त्यांनी 'कोरोना XXX (आक्षेपार्ह शब्द) लोकांना होतो', असे वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली होती.

पंढरपूर आषाढी पायी वारी करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी करणारे निवेदन घेऊन संभाजी भिडे हे सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे गेले होते. हे निवेदन देत असतान त्यांनी संवाद साधला. या वेळी बोलताना भिडे यांनी हे विधान केले. (हेही वाचा, Sambhaji Bhide: कोरोना व्हायरस संसर्गामुळे मरणारी माणसे जगण्याच्या लायकीची नाहीत- संभाजी भिडे)

काय म्हणाले संभाजी भिडे?

संत परंपरा जपल्याने जीवनातील विघ्नं दूर होतात. त्यामुळे पंढरपूर आषाढी पायी वारीस परवानगी द्यावी. या वारीनंतर केवळ देशातीलच नव्हे तर जगातील कोरोनाही दूर होईल. आपणा सर्वांनाच कोरोनामुक्त भारत हवा आहे. तो होणारच आहे. कोरोना दूर करायचा असेल तर पायी वारीस परवानगी द्यायला हवी, असे संभाजी भिडे यांनी म्हटले.

संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेकडो वर्षांपासून सुरु असलेली पायी वारीची परंपरा खंडीत झाली आहे. गेल्या वर्षीही असंख्य वारकरी पायी वारी करण्यास उत्सुक होते. परंतू, ते घडले नाही. यंदा काही ठरावीक जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी आहे. राज्यातील जवळपास सर्वच राजकीय कार्यक्रम सुरु आहेत. त्यामुले वारीलाही परवानगी मिळावी, असे संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संभाजी भिडे यांनी केलेले हे पहिलेच वादग्रस्त विधान नाही. या आधीही त्यांनी अनेक विधाने वादग्रस्त पद्धतीने केले आहेत. 'अंबे खाल्याने अपत्यप्राप्ती होते', 'कोरोना XXX वृत्तीच्या लोकांना होतो' ही काही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची उदाहरणे देता येतील.