पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती अंबानी, अदानी यांचे लाऊड स्पिकर: राहुल गांधी
Rahul Gandhi At Wani in Yavatmal | (Youtube)

Maharashtra Assembly Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) हे जेथे जातील तेथे खोटे बोलतात. अडचणीत सापडले की लोकांचे लक्ष दुसरीकडे भटकवतात. सध्या देशाची अर्थव्यवस्था प्रचंड धोक्यात असून, त्याला नोटबंदी कारणीभूत आहे. मोदी सरकारने जनतेच्या खिशातून पैसे काढले आणि उद्योगपतींच्या खिशात घातले. पंतप्रधान मोदी हे उद्योगपती अंबानी, अदानी यांचे लाऊड स्पिकर आहेत. त्यांच्यासाठी जनतेच्या फायद्याचे असलेले मनरेगा, जमीन अधिग्रहण यांसारखे कायदे बदलले, असा घणाघात काँग्रेस ( Congress) पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि आघाडीच्या उमेदवार प्रचारासाठी आयोजित सभेत ते यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील वणी (Wani) आयोजित सभेत ते बोलत होते.

मूळ मुद्द्यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीर, कलम 370, चांद्रयान यांसारखे मुद्दे पुढे करत असते. चांगले आहे यावर जरूर चर्चा करा. पण, देशातील तरुणांना नोकरी, बेरोजगारी, शेतकरी यांवर कधी भाष्य करणार असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला. यासोबतच सरकारचे हे कृत्य जर असेच राहीले तर देशातील बेरोजगारी येत्या सहा महिन्यांत दुप्पट होईल. जोपर्यंत नरेंद्र मोदी सत्तेवर आहेत तोपर्यंत यात काहीही बदल होणार नाही. म्हणूनच संधी द्या महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे सरकार सत्तेत आणा राज्य आम्ही पुन्हा एकदा सुस्थितीत आणू, असेही राहुल गांधी यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची यवतमाळ, आर्वी येथे उद्या सभा)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राहुल गांधी दोन ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. यातील पहिली सभा ते यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील वणी (Wani) येथे दुपारी 2 वाजता पार पडली. तर दुसरी सभा वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आर्वी (Arvi) येथे पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रणधुमाळी आता हळूहळू अंतिम क्षणांकडे निघाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी निकराचे प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांचाच भाग म्हणून राजकीय पक्षांनी प्रचारसभा, पदयात्रा, कोपरा सभा आदींवर भर दिला आहे.