Pune Public Transport: पुण्यात सार्वजनिक वाहतुकीबाबत नवी समस्या; गेल्या 4 महिन्यांत 6,000 हून अधिक PMPML बसेसमध्ये बिघाड
PMPML BUS

Pune Public Transport: गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातील (Pune) सार्वजनिक वाहतुकीबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. नागरिकांकडून सार्वजनिक बसेसचा वापरही बराच कमी झाला आहे. आता पुणेकरांना पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) बसेसबाबतच्या नव्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या बसेसचा बिघाड ही नवी समस्या समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील सार्वजनिक बसेसमध्ये वारंवार बिघाड होत आहे. अधिकाऱ्यांकडून आश्वासन असूनही, पीएमपीएमएल बसेसची विश्वासार्हता संशयास्पद आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या चार महिन्यांत एकूण 2,494 बसेस (पीएमपीएमएल द्वारे चालवल्या जाणाऱ्या) आणि 3,566 (भाडेपट्टीवर घेतलेल्या) मोडकळीस आल्या आहेत.

या विरोधात अनेक नागरिक सातत्याने आवाज उठवत आहेत. याबाबत सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले, 'बस आगारातून बाहेर काढण्यापूर्वी, अधिकाऱ्यांनी त्यांची योग्य प्रकारे तपासणी करावी. जर त्या रस्त्यातच मोडल्या तर तत्काळ कारवाई केली पाहिजे.' याशिवाय वेलणकर यांनी बसेसच्या दुरवस्थेचाही उल्लेख केला. ते म्हणाले, प्रशासनाकडून बसेसच्या स्वच्छतेबाबत लक्ष दिले जात नाही, लोक पीएमपीएमएल बसेस निवडण्यास नाखूष असतात.'

याबाबत संजय शितोळे म्हणतात, प्रवासात बस ब्रेकडाऊनमुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक मोठी समस्या आहे कारण त्यांना एका बसमधून उतरणे आणि दुसऱ्या बसमध्ये चढणे अवघड आहे. सामाजिक कार्यकर्ते जुगल राठी यांनी पीएमपीएमएल बसेसच्या वाढत्या बिघाडाचे कारण मेंटेनन्स सिस्टीमचा अभाव असल्याचे सांगितले. मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या सततच्या बदल्याही बसेसच्या स्थितीच्या दुर्लक्षात महत्त्वाची भूमिका बजावतात. (हेही वाचा: Ravindra Dhangekar on Pune Drugs case: पुणे ड्रग्ज प्रकरण, रविंद्र धंगेकर यांच्या दाव्यामुळे खळबळ)

याबाबत पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) संजय कोलते फ्री प्रेस जर्नलशी बोलताना म्हणाले, 'आम्ही ब्रेकडाऊन कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही मुख्य यांत्रिकी अभियंत्यांना किमान ब्रेकडाउन सुनिश्चित करण्याच्या आणि बसेसची देखभाल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शहरातील आगारनिहाय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत. काही जुन्या बसेस काढल्या जातील आणि प्रवाशांचा प्रवास सुरळीत करण्यासाठी पुढील चार महिन्यांत 500 नवीन सीएनजी बसेस जोडल्या जातील.'