India-China Clash: पंतप्रधान मोदीजी आपले 20 जवान शहीद झाले, आपण काय केले? काहीतरी बोला! शिवसेना खासदार संजय राऊत यांचा निशाणा
PM Modi, Sanjay Raut | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गलवान (Galwan) खोऱ्यात झालेल्या भारत-चीन (India-China Clash) झटापटीत भारताला 20 जवाना गमवावे लागले. अजूनही 4 जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, भारत-चीन ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर देशात राजकारण रंगू लागले आहे. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींना आपल्या खास शैलीत निशाणा साधला आहे. दरम्यान, काँग्रेसनेही भारत-चीन वादावरुन केंद्र सरकारला लक्ष्य करत काल प्रश्न विचारले होते. विशेष असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आली नाही.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपण शूर आणि योद्धा आहात. आपल्या नेतृत्वाखाली देश चीनचा बदला घेईन. चीनच्या अडेलतट्टूपणाला कडक प्रत्युत्तर कधी मिळेल. कोणत्याही प्रकारचा गोळीबार न होता आपले 20 जवान शहीद झाले. आपण काय केले? चीनचे किती जवान मारले गेले? चीन आपल्या हद्दीत घुसला आहे काय? पंतप्रधान महोदय या संघर्षाच्या काळात देश आपल्या सोबत आहे. परंतू, नेमके सत्य काय आहे? बोला... काहीतरी बोला.. देश सत्य जाणून घेऊ इच्छितो... जय हिंद! (हेही वाचा, India-China Relations: चीनचे राष्ट्रपती मोदींच्या गावात झोपाळा हलवून गेले पण..: शिवसेना)

संजय राऊत ट्विट

दरम्यान, संजय राऊत यांच्याप्रमाणेच काँग्रेसनेही केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत आरोप केले होते. केंद्र सरकार देशाच्या जनतेपासून काहीतरी लपवतं आहे. चीनी सैन्याने खरोखरच आपल्या हद्दीत घुसखोरी केली आहे काय? एकही गोळी न झाडली जाता इतके सैनिक मारले गेलेच कसे? आपण चीनचे किती सैनिक मारले? पंतप्रधान अथवा केंद्र सरकार अद्यापही अधिकृत प्रतिक्रिया का देत नाही?, असे सवाल काँग्रेसकडून विचारण्यात आले होते.