Police Recruitment in Maharashtra: महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 पदांसाठी भरती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितली तारीख
Police | (File Photo)

महाराष्ट्र राज्य पोलीस दलात (Maharashtra State Police) नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पुन्हा एकदा खुशखबर दिली आहे. राज्यातील पोलीस दलात लवकरच तब्बल 15,000 पदांसाठी पदांची भरती प्रक्रिया (Police Recruitment In Maharashtra) राबवली जाणार आहे. येत्या 15 जूनपासून ही भरती प्रक्रिया (Maharashtra Police Recruitment 2022) सुरु होईल. राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ही भरती प्रक्रिया राबवली जाईल, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. राज्यातील पोलीस भरतीचा विषय नेहमीच चर्चेत असतो. राज्याच्या ग्रामीण भागातील हजारो तरुण या पोलीस भरतीकडे डोळे लावून बसलेले असतात. त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातो आहे.

एका खासगी वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर येत्या 15 जूनपासून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. राज्याच्या पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. राज्यातील पोलीस दलातील रिक्त जागा आणि आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची गरज लक्षात घेता आणिखी 15,000 पदे भरावी लागणार आहेत. याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच मागणी केली जाईल. ही पदे भरण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सकारात्मक आहेत. त्यामुळे लवकरच या प्रक्रियेला गती मिळेल, असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra Police Recruitment 2022: महाराष्ट्र पोलीस दलात होणार 7 हजार पदांची भरती, तपशील घ्या जाणून)

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या वेळी पोलिसांच्या बदल्यांबाबतही मत व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय पोलिसांच्या बदल्या करता येणार नाही. मात्र प्रशासकीयदृष्ट्या जर आवश्यकता भासली तर बदलीचा निर्णय घ्यावाच लागेल. पोलीस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्या करण्याचा अधिकार पोलीस महासंचालकांना आहे. उपअश्रीक्षक पदाच्या बदल्यांचे अधिकार मात्र मंत्र्यांना आहेत. भारतीय पोलीस सेवेत असलेल्या (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यामुळे ही पारदर्शकता पाळली जाईल, असेही वळसे पाटील यांनी या वेळी सांगितले.