Drugs Seized: मागील दोन महिन्यांत राज्यातील 'या' 5 जिल्ह्यांमधून 3.5 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

गेल्या दोन महिन्यांत नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार विभागात 3.47 कोटी रुपयांचे ड्रग्स पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य - फेसबुक)

गेल्या दोन महिन्यांत नाशिक ग्रामीण (Nashik Rural), अहमदनगर (Ahmednagar), जळगाव (Jalgaon), धुळे (Dhule) आणि नंदुरबार (Nandurbar) विभागात 3.47 कोटी रुपयांचे ड्रग्स पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, नाशिक विभागांतर्गत जिल्ह्यांतून बहुतांशी अमली पदार्थ (Drugs) वाहतूक होत असताना जप्त करण्यात आले आहेत. यासंदर्भात एकूण 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

माझ्या हाताखालील सर्व पोलीस तुकड्यांच्या प्रमुखांना कार्यभार स्वीकारल्यानंतर विभाग अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर, संबंधित एसपींनी त्यांची गुप्तचर यंत्रणा वाढवली आणि माहिती मिळताच छापे टाकण्यात आले, असे नाशिक विभागाचे डीआयजी बी.जी. शेखर पाटील म्हणाले. (Mumbai: ANC कडून 2.25 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त; 7 जणांना अटक)

जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये 3.38 कोटी रुपयांचा 5,000 किलो गांजा, 7.50 लाख रुपयांची 500 ग्रॅम ब्राऊन शुगर आणि 1.44 लाख रुपये किमतीची 481 ग्रॅम चरस यांचा समावेश आहे. पाच विभागातील पोलिसांनी ट्रक, कार, मोटारसायकल, मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले असून ड्रग्ज आणि इतर जप्त केलेल्या वस्तूंची एकूण रक्कम 3.71 कोटींवर पोहोचली आहे.

गेल्या दोन महिन्यांत नाशिक ग्रामीण पोलिसांत तीन, नंदुरबार पोलिसांत तीन, धुळे पोलिसांत दहा व नंदुरबार पोलिसांत पाच गुन्हे दाखल झाले आहेत. सर्व अंमली पदार्थ नाशिक विभागाच्या महामार्गांद्वारे राज्याच्या इतर भागांमध्ये जात होती. वाहतूकदार पोलीस तपासणी टाळण्यासाठी विविध अंतर्गत मार्ग वापरत होते. मात्र, माहितीच्या मदतीने पोलिसांनी संबंधित वाहने अडवली, अशी माहिती शेखर पाटील यांनी दिली. 21 प्रकरणांमध्ये पोलिसांनी 24 जणांना अटक केली आहे तर 14 जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement