Aurangabad Name Change: मनसे आक्रमक! औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावले संभाजीनगर लिहलेले बॅनर
MNS Flag (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा (Aurangabad Name Change) मुद्दा चांगलाच पेटला आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीत एकमत नसून परस्पर विरोधी वक्तव्ये केली जात आहेत. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरुन महाविकास आघाडीत एकमत नसल्याने भाजपाकडूनही राज्य सरकारवर टीका केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये (Nashik) आंदोलन करून औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेल्या दिशादर्शक फलकाला 'छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा रस्ता' असा फलक लावला आहे. दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीमुळे परवानगी नसतानाही मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी कारवाई करून मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना, भाजप यांच्यासह मनसेनेही केली आहे. मात्र, या मागणीला काँग्रेसकडून विरोध दर्शवला जात आहे. यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. याचदरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांनी जुन्या औरंगाबाद नाक्यावर आज दुपारी आंदोलन केले. तसेच औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेल्या दिशादर्शक फलकाला 'छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा रस्ता' असा फलक लावला. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे परवानगी नसतानाही मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले आहे. त्यामुळे पंचवटी पोलिसांनी 12 मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. हे देखील वाचा- Mumbai Commissioner: मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त आवश्यक; पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. मात्र, या सरकारमधील तिन्ही पक्ष भिन्न विचाराचे असून हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. तसेच महाविकास आघाडीचे सरकार अंतर्गंत वादातून पडेल, अशी टीका विरोधी पक्षांकडून वारंवार केले जात आहे. यामुळे विरोधी पक्षांचे भाकीत खरे ठरते की काय? हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल.