कामगारांना आता महाराष्ट्रात येताना पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही, योगी आदित्यनाथ यांच्या विधानावर राज ठाकरे यांचे उत्तर
RajThackeray (Photo Credits: File Photo)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. परंतु लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या स्थलांतरित कामगार आणि मजूर वर्गाला त्याचा फटका बसला आहे. जवळजवळ दीड महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला असून उत्पादनाचे कोणतेच साधन नसल्याने या स्थलांतरित कामगारांनी आपल्या घरची वाट पकडली आहे . याच दरम्यान आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)  यांनी त्यांच्या राज्यातील कामगार हवे असल्यास सरकारची परवानगी लागेल असे म्हटले आहे. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या विधानावर उत्तर दिले आहे.

राज ठाकरे यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, योगी आदित्यनाथ यांनी जसे म्हटले आहे कामगारांसाठी परवानगी घ्यावी. तसेच आता यापुढे महाराष्ट्रात येताना येथील पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे योगी आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावे असे म्हटले आहे. त्याचसोबत महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच कामगारांना आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि स्टेशनमध्ये त्यांचे फोटो असावेत. कामगारांची ओळखळ असली पाहिजे तर त्यांना महाराष्ट्रात प्रवेश देण्याचा कटाक्ष महाराष्ट्राने पाळावा असे ही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.(Lockdown: 527 ट्रेनने 7 लाख 38 हजार परप्रांतीय कामगार मूळ राज्यात परतले; पाहा मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, नागपूर शहरांतून किती सुटल्या विशेष श्रमिक ट्रेन)

दरम्यान, राज्य सरकारने स्थलांतरित कामगारांना राज्य सोडून जाऊ नये असे कधीच म्हटले नाही. परंतु त्यांनाच त्यांच्या घरी जायचे असल्याचे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच स्थलांतरित कामगारांना आपल्या घरी सुखरुप जाता यावे यासाठी सुद्धा सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास त्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. येत्या काही काळात कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता असली तरीही सरकार त्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचा विश्वास दर्शवण्यात आला आहे.