Maharashtra Weather Updates: पुढील पाच दिवस मध्यम ते तीव्र मेघगर्जनेसह जोरदार वारे, पावसाचा अंदाज; पहा आयएमडीचा हवामान अंदाज
राज्यांत अनेक भागांमध्ये मागील 4 दिवसांपासून पाऊस बरसत आहे. ढगाळ हवामानामुळे उष्णताही कमी झाल्याचं दिसत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामे मात्र खोळंबल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी पिकांनाही फटका बसला आहे.
अंदमान-निकोबार बेटावर काल 13 मे दिवशी यंदाचा मान्सून धडकला आहे. या मान्सूनच्या पुढील वाटचालीवर लक्ष असणार आहे. पण सध्या राज्यामध्ये पुढील 5 दिवस वादळी वारा आणि पावसाचे राहणार आहेत. आयएमडीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रामध्ये पुढील 5 दिवस मध्यम ते तीव्र मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहणार आहेत. सोबतच पावसाच्या सरी देखील बरसण्याचा अंदाज आहे. 14-15 मे दिवशी राज्यातील काही जिल्ह्यांना आयएमडी कडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना वीजांच्या कडकडाटापासूनही सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. नक्की वाचा: Lightning Safety Tips: गडगडाटी वादळात वीज कोसळण्याची भीती; स्वत:च्या सुरक्षेसाठी खास टीप्स.
महाराष्ट्रातील हवामान अंदाज
आज महाराष्ट्रामध्ये लातूर, पुणे, सातारा, रायगड, नाशिक, कोल्हापूर, घाट क्षेत्रात गडगडाटासह ढगांचा वर्षाव दिसून आला आहे. पुढील 3-4 तासांत वादळी वाऱ्यांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वादळी वार्याचा फटका कुणाला?
विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदीया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील काही दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यातील जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यातही काही ठिकाणी पुढील 5 दिवस वादळी पाऊस बरसू शकतो असा हवामान विभागाचा अंदाज आहे.