Monsoon | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आज भारतात निकोबार बेटांमध्ये मान्सूनचं आगमन झाले आहे. अपेक्षेपेक्षा आठवडाभर आधीच नैऋत्य मोसमी वारे यंदा दाखल झाले आहेत. येत्या काही दिवसांत मान्सून हळूहळू पुढे सरकरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता निकोबार बेटे, दक्षिण अंदमान समुद्र तसंच बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागत मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभागाने आज जाहीर केलं आहे.

अंदमान-निकोबारमध्ये दरवर्षी साधारणपणे 20 मे पर्यंत मान्सून दाखल होतो. यंदा आठवडाभर आधीच तिथे मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे आता येत्या 3-4 दिवसांत मान्सून अंदमान-निकोबार द्वीपसमूह पूर्ण व्यापून टाकेल, तसंच अरबी समुद्राचा दक्षिण भाग, मालदीवमध्येही आगेकूच करेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

भारतामध्ये जून- सप्टेंबर या महिन्यांमध्ये साधारणपणे वर्षभरातील 70 टक्के पाऊस पडतो. हा पाऊस देशातील शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहिरी अर्थात पाणीसाठ्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून मान्सूनच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जातं. नक्की वाचा: Maharashtra Weather Alert: मुंबई, पुणे आणि विदर्भात गडगडाटासह अवकाळी पाऊस; IMD हवामान अंदाज; अलर्ट जारी .

मान्सून भारतामध्ये दाखल

महाराष्ट्रात मान्सून कधी येणार?

आज अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालेला मान्सून आता येत्या 6 जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 27 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल त्यानंतर त्याची आगेकूच महाराष्ट्राच्या दिशेने होणार आहे.

मॉन्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त बरसणार आहे. जवळपास 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुद्धा जास्त पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.