Maharashtra Political Crisis: 'महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा'; मंत्री Ramdas Athawale यांची मागणी
अहवालानुसार आज संध्याकाळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये 15 मिनिटांची चर्चा झाल्याचे समजत आहे. यावेळी शिंदे यांनी शिवसेनेसमोर भाजपमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव ठेवला. आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी सत्ताधारी पक्षाची बैठक सुरु आहे.
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणामध्ये उलथापालथ झाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेमध्ये (Shiv Sene) फुट पडल्याचे दिसून आले होते. त्यात नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पक्षाशी बंड करून जवळजवळ 35 आमदारांसह सुरत येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. या आमदारांनी सेनेची साथ सोडल्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळू शकते. सेनेकडून एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरु असताना, रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या वृत्तादरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याबाबत केलेल्या एका ट्वीटमध्ये आठवले म्हणतात, ‘एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही.’
एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे.महाविकास आघाडी चे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 21, 2022
कानपूरमधील कार्यक्रमादरम्यान आठवले म्हणाले की, ‘आपण या घटनाक्रमाची खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. महाआघाडीचे सरकार संकटात असून ते पडणार हे निश्चित आहे.’ दरम्यान, सोमवारी रात्री झालेल्या राज्य विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर काही तासांतच राजकीय घडामोडींना नाट्यमय वळण लागले. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने लढवलेल्या 6 जागांपैकी एक जागा गमावली आणि विरोधी भाजपने सर्व जागा जिंकल्या. त्याचेवेळी शिवसेनेमध्ये फुट पडल्याचे दिसून आले.
त्यानंतर सकाळी एकनाथ शिंदे आणि काही आमदार यांच्याशी संपर्क होऊ शकत नसल्याची बातमी आली. थोड्या वेळातच शिंदे 35 आमदारांसह सुरतमध्ये असल्याचे समोर आले. या घटनेने राज्याचे राजकारण ढवळून निघाले. त्यात महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपले बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवून, त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नेमणूक केली. (हेही वाचा: Maharashtra Political Crisis: शिवसेना अल्पमतात त्यामुळे आपणच गटनेते राहणार असल्यावर Eknath Shinde ठाम- सूत्र)
अहवालानुसार आज संध्याकाळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये 15 मिनिटांची चर्चा झाल्याचे समजत आहे. यावेळी शिंदे यांनी शिवसेनेसमोर भाजपमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव ठेवला. आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी सत्ताधारी पक्षाची बैठक सुरु असून, शिंदेंच्या बंडखोरीबाबत काय निर्णय होतोय हे लवकरच समोर येईल.
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2022 08:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

