Maharashtra: सर्वसामान्यांना कांदा रडवणार; विक्रेत्यांचे 16 ऑगस्टपासून बेमुदत विक्री बंद आंदोलन, जाणून घ्या मागण्या
Onions (Photo Credits: IANS)

व्यापाऱ्यांच्यावर कांद्याच्या किमतीचा (Onion Prices) मोठा परिणाम होतो. कांद्याचे भाव पडले की त्याचा परिणाम होतो आणि जेव्हा भाव वाढतो त्याचाही परिणाम होतो. सध्या मालाच्या कमी भावामुळे कांदा उत्पादकांची निराशा झाली आहे. कांद्याला भाव न मिळाल्याने नाराज झालेल्या कांदा उत्पादकांनी 16 ऑगस्टपासून बेमुदत कांदा विक्री बंद आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. कांद्याला सरासरी 25 रुपये किलो भाव न मिळाल्यास 16 ऑगस्टपासून कांद्याची विक्री बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघाने दिला आहे.

कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने गेल्या सात महिन्यांपासून शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे महाराष्ट्र कांदा उत्पादक संघाने म्हटले आहे. संघाने पुढे म्हटले, राज्य व केंद्र सरकारने कांदा उत्पादकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. परदेशी कांदा आयात करणे, कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकणे, कांद्याचा साठा मर्यादित ठेवणे अशा विविध युक्त्या वापरून कांद्याचे भाव पाडण्याचे कारस्थान सुरू आहे.

संघाची तक्रार आहे की, कांदा उत्पादकांकडून कवडीमोल भावाने कांदा खरेदी करून सरकार भरपूर नफा कमावत आहे. सरकार शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. कांद्याच्या प्रश्नावर आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री यांच्याकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आणि राज्यातील विविध शेतकरी संघटनांनीही कांद्याला भाव मिळत नसल्याच्या प्रश्नावर आवाज उठवला असून राज्य व केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करून कांदा परिषदेच्या माध्यमातून भारत बंदसह अनेक आंदोलने केली आहेत. मात्र सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. कांद्याचे भाव वाढवण्याचा कोणताही विचार केला गेला नाही.

एकीकडे बाजार समितीत शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत असताना यंदा नाफेडकडून अडीच लाख टन कांद्याची खरेदी करण्यात आली. पण, नाफेडनेही शेतकऱ्यांकडून 10 ते 12 रुपये किलोने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जिथे कांद्याचा उत्पादन खर्च 20 ते 22 रुपये किलो असायचा, तिथे आता गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना सरासरी 8 ते 10 रुपये किलो भाव मिळत आहे. (हेही वाचा: सीएनजी दराची 6 रुपयांची उसळी, एका महिन्यात दुसऱ्यांदा वाढ; पुणेकर कातावले)

कांदा बाजार समितीत मालाला चांगला भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहेत, वरून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा सुरक्षित ठेवणे त्यांच्यासाठी आव्हानापेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीमध्ये या दिवसात कांदा उत्पादकांचे दुहेरी नुकसान होत आहे. महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचा सरासरी 25 रुपये किलो दराने लिलाव करण्याची मागणी केली असून, त्यांची मागणी मान्य न झाल्यास 16 ऑगस्ट 2022 पासून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याची विक्री अनिश्चित काळासाठी बंद करणार आहेत.