Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्रात 15 जूननंतरच मान्सूनचा पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता; शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी घाई न करण्याचे आवाहन

कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातील पीक पाणी, पेरण्या खते पुरवठा याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व भागात 15 जून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये.

Farmers of Maharashtra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात 15 जून नंतरच मोसमी पाऊस (Monsoon) पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पाऊस, पीक पाणी, धरणाच्या जलाशयातील पाणी साठा आदीचा आढावा घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या बैठकीत कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातील पीक पाणी, पेरण्या खते पुरवठा याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व भागात 15 जून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये. 15 जून नंतरच पावसानंतर मार्गक्रमण होण्यासाठी सक्रिय वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे.

राज्यातील 17 जिल्ह्यात 25 टक्के पेक्षा कमी, 12 जिल्ह्यात 25 ते 50 टक्के, 4 जिल्ह्यांत 50 ते 75 टक्के तर 1 जिल्ह्यात 100 टक्के हून अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील विविध विभागांत खते आणि बियाणे यांचा सुरळीत पुरवठा झाला आहे. अनेक भागात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मोसमी पाऊस येत्या 3 ते 4 दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. दक्षिण व्दीपकल्पीय भारताच्या भूभागातील कर्नाटकात 12 ते 15 जून दरम्यान आणि कोकण आणि गोवा येथे 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी सादरीकरणाद्वारे दिली.

त्यांनी सांगितले की, मोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या 3 ते 4 दिवसांत आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात 12 जून रोजी मराठवाड्यातील काही भागात 12 ते 14 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा येथे 12 आणि 15 जून दरम्यान मुसळधार तर 13, 14 जून रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये. वीजांच्या गडगडाटांसह वादळ होत असताना खुल्या मैदानावर काम करु नये, वीजा होताना झाडांच्या खाली आसरा घेऊ नये, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वीज पुरवठा खंडित करुन ठेवावा, ओढा, तलाव, नदी आदी पाण्याच्या स्त्रोतातून तत्काळ बाहेर पडावे, वीज वहन करणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान, राज्यातील सर्व प्रमुख धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाणीसाठा असल्याचे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले. जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी माहिती दिली.

धरणाचे नाव, सध्याचा पाणी साठा, गेल्या वर्षीचा साठा- गोसीखुर्द 4.64 TMC (8.67), तोतलाडोह 18.79 (18.14), ऊर्ध्व वर्धा 8.85 (8.87), जायकवाडी 22.60 (2.99), मांजरा 1.63 (0.00), ऊर्ध्व तापी हातनूर 5.32 (2.63), गंगापूर 2.50 (2.48), कोयना 17.36 (10.00), खडकवासला 0.84 (1.03), उजनी 18.72 (0.00), भातसा 9.95 (8.17), धामणी 3.11 (1.77).

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement