महाराष्ट्र काँग्रेस शिष्टमंडळाने SM रॅकेट प्रकरणी घेतली मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट; BJPचा सोशल मीडिया द्वारा नवा दहशतवाद फोफावल्याचा Sachin Sawant यांचा घणाघात
Sachin Sawant, Congress | (Photo Credits: Facebook)

मागील काही दिवसांमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिसांच्या विरोधात अनेक उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान त्यांच्याबद्दल बदनामीकारक शब्दांचा, भाषेचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणी सध्या सायबर सेल तपास करत असून दोन FIR देखील दाखल करण्यात आले आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांनी देखील काल भाजपावर हल्लाबोल केल्यानंतर आज भाजपाच्या सोशल मीडिया रॅकेटसंदर्भात सचिन सावंत (Sachin Sawant) यांच्या नेतत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेतली. भारतीय जनता पक्षाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून नवा दहशतवाद फोफावला असून भाडोत्री आयटी सेलच्या माध्यमातून रातोरात ट्विटर, फेसबुकवर अकाऊंट उघडून बदनामी वा अपप्रचाराची मोहिम राबवण्याचे उपद्याप सुरु आहेत. हा नवा दहशतवाद लोकशाही विरोधात रचलेला कटच आहे. या नव दहशतवादाचे समुळ उच्चाटन झाले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणा आडून महाराष्ट्र, मुंबई पोलिसांची बदनामी करणार्‍यांनी माफी मागावी: महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी.

शिष्टमंडळात पक्ष प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, रत्नाकर सिंग उपस्थित होते. या बदनामी मोहिमेचा टविटरवरुन मिळालेला डेटा पुढील तपासासाठी पोलिसांकडे देण्यात आला आहे.पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये या कंपन्यांची नावं, सोशल मीडियावरील खरे व फेक अकाऊंटसची माहिती आहे. याची चौकशी करु, असे आश्वासन पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिले आहे, असे सावंत म्हणाले.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, भाजपाने सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांची बदनामी करण्याची, त्यांची प्रतिमा मलीन करण्याची मोहीम पद्धतशीरपणे चालवण्याचा नवा ट्रेंड आणला असून हा नव दहशतवाद आहे. याच माध्यमातून रातोरात हजारो ट्विटर, फेसबुक अकाऊंट उघडून बदनामीची मोहीम राबवली जाते. सुशांतसिंग राजपूत प्रकरणातही याच रॅकेटचा वापर करण्यात आला आहे. या ट्विटची वर्तनात्मक पद्धत, इतिहास, त्यांचे ट्विट व रिट्विट पाहिल्यास असे दिसते की महाराष्ट्र सरकार विरोधात विचारपूर्वक व नियोजित कट कारस्थान आहे. Mumbai Police Defamation Case: मुंबई पोलीस बदनामी प्रकरणी दोन गुन्हे दाखल, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा संबंध, सोशल मीडिया गैरवापर भोवला

या ट्विटच्या असामान्य पॅटर्ननुसार फेसबुक, ट्विटरचा कोणताही सामान्य वापरकर्ता 3 महिन्यांत 40 हजार ट्वीट/पोस्ट करू शकत नाही. यातील बहुतांश ट्विटर हँडलने दर मिनिटाला २५ ट्विट्स केल्याचे दिसते. हे सर्व ट्विट साधारणपणे एकाच विषयाच्या संदर्भात करण्यात आलेत ते म्हणजे सुशांत सिंह राजपूत (SSR). त्यांचे हॅशटॅगही कॉमन आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, महाराष्ट्र पोलिस आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही व्यावसायिक एजन्सींच्या मार्फत हे करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री हे आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठीच मुंबई पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत असे चित्र रंगवण्याचा या मोहिमेचा एकमेव उद्देश होता. भाड्याने घेतलेल्या सोशल मीडियावर ट्रेंड सेट करण्याची ही पद्धत असून याच माहितीच्या आधारावर गोदी न्यूज चॅनेल्स जोरजोरात अपप्रचार करतात. सुशांतच्या आत्म्याशी बोललो असल्याचा दावा करणारा एक व्हीडीओ यूट्यूब चॅनेलवर व्हायरल झाला होता. गोबेल्स तंत्राची ही विकसित आवृत्ती असून त्यावर आरुढ होत भाजपाचे नेते कृत्रीम जनमत बनवत आहेत, हे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे, असे सावंत म्हणाले..

भाजपाच्या या नव दहशतवादाचा काँग्रेसने भांडाफोड करून यामागील खरा मास्टरमाइंड शोधण्यासाठी एसआयटीची स्थापना करून सोशल मीडीयाचे रॅकेट उद्धवस्त करावे अशी मागणी केली होती. मुंबई पोलिसांनीही तपास करत अशा ८० हजार बोगस अकाऊंटच्या माध्यमातून बदनामीची मोहिम राबवल्याचे उघड केले आहे. मिशीगन विद्यापीठानेसुद्धा अशा मोहिमेत भाजपाचा हात असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. फेसबुक व भाजपाच्या अभद्र युतीचा पर्दाफाशही वॉल स्ट्रिट जनरलने उघड केला होता.

पालघरमधील दोन साधूंच्या हत्यावेळी, दिल्ली दंगलीतही हीच मोडस ऑपरेंडी वापरण्यात आली होती आणि भविष्यातही अशाच पद्धतीने हे उपद्व्याप करुन समाजात अशांत पसरवली जाऊ शकते, तसेच विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. अशी भीती सावंत यांनी व्यक्त केली आहे