Maharashtra Assembly Elections: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी उचलले मोठे पाऊल; पराभूत उमेदवारांना EVM बाबत दिल्या 'या' सूचना
महाविकास आघाडी निवडणूक निकालापासून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहे. शिवसेनेच्या (यूबीटी) उमेदवारांनी ईव्हीएम घोटाळ्याचा संशय व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील (Maharashtra Assembly Elections 2024) दारूण पराभव महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) पक्षांना अजूनही पचवता आलेला नाही. शरद पवारांनंतर आता उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) ईव्हीएमबाबत आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या (यूबीटी) बैठकीत पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम घोटाळ्याचा संशय व्यक्त केला होता. या आरोपानंतर आता उद्धव ठाकरेंनी मोठे पाऊल उचलले आहे. उद्धव यांनी त्यांच्या पराभूत उमेदवारांना VVPAT च्या पुनर्गणनेसाठी याचिका दाखल करण्यास सांगितले आहे.
महाविकास आघाडी निवडणूक निकालापासून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहे. शिवसेनेच्या (यूबीटी) उमेदवारांनी ईव्हीएम घोटाळ्याचा संशय व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत ज्या मतदान केंद्रांवर ईव्हीएम घोटाळ्याचा संशय आहे, त्या मतदान केंद्रांवर 5 टक्के व्हीव्हीपीएटी पुनर्गणनेसाठी याचिका दाखल करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. (हेही वाचा: विधानसभा निवडणुकीमध्ये चौथ्यांदा पराभूत नरसय्या आडम यांनी केली निवृत्तीची घोषणा)
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सर्व पराभूत उमेदवारांना ईव्हीएम घोटाळ्याचा संशय असलेल्या मतदान केंद्रावर 5% VVPAT ची पुनर्मोजणी करण्यासाठी त्वरित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांनुसार, पराभूत उमेदवार निकालाच्या 6 दिवसांच्या आत 5% VVPAT ची पुनर्गणना करण्याची मागणी करू शकतात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना यूबीटी पक्षाने 95 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ 20 उमेदवार विजयी होऊ शकले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57 जागांवर विजय मिळवला आहे.
आज (27 नोव्हेंबर) दुपारी उद्धव ठाकरे शिवसेना नेते आणि विजयी आमदारांची मातोश्रीवर बैठक घेणार आहेत. तत्पूर्वी, ठाकरे यांनी मुंबईतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाच्या निराशाजनक कामगिरीचा आढावा घेतला. या बैठकीला उपस्थित असलेल्या एका माजी आमदाराने सांगितले की, निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या काही आमदारांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली. दरम्यान, यापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव यांच्या पक्षाने (अविभाजित शिवसेना) 56 जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव यांनी त्यांचा जुना मित्र भाजप सोडला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले.
(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2024 04:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

