महाराष्ट्रात 1 सप्टेंबरपासून व्यायाम शाळा, मंदिर सुरु होणार? राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
Gym, Temple (Photo Credit: Wimikedia Commons)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये (Lockdown) आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यातील बऱ्याच गोष्टी सुरु झाल्या आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून लॉकडाऊन उघडणार की कायम ठेवणार? याबाबत महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राज्यातील व्यायाम शाळा (Gym) आणि धार्मिक स्थळे (Temple)  सुरु करण्यास राज्य सरकार परवानगी देईल का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.  दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिम, मंदिर यासंबंधी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो असे सांगितले आहे.

लॉकडाउनमुळे जिम आणि मंदिर गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहेत. राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत अनेक राजकीय नेत्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. तसेच राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात यावी, अशा मागणींनी अधिक जोर धरला आहे. तसेच जिम 15 ऑगस्टपासून सुरु होतील, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, अनलॉक 4 च्या अंतर्गत राज्यातील व्यायाम शाळा आणि मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात येईल का? याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करायला हवे- संजय राऊत

तसेच,  एएमआयचे खासदार यांनीही राज्यातील मशिदी उघडण्याबाबत आक्रमक भुमिका घेतली आहे. राज्य सरकारने 1 सप्टेंबर रोजी मशिदी उघडण्यास परवानगी दिली नाहीतर, येत्या 2 सप्टेंबरपासून राज्यातील सर्व मशिदी उघडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “आम्ही आमच्या वतीने अल्टिमेटम देत आहोत. 1 तारखेला गणपती विसर्जन आहे. हिंदू बांधवांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. 1 तारखेपासून सगळी मंदिर उघडा आणि 2 तारखेपासून आम्ही आमच्या सगळ्या मशिदी उघडणार. काही योग्य तर्क असतील तर ऐकू अन्यथा परवानगी दिली नाही तरी 2 तारखेपासून सर्व मशिदी उघडू हे सरकारमधील लोकांना मला सांगायचे आहे,” असे आव्हानच इम्तियाज जलील यांनी दिले आहे. याची सुरुवात आपणच औरंगाबादमधून करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.